Balasaheb Thorat
Balasaheb Thorat sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बाळासाहेब थोरात म्हणाले, आमचे राज्यसभा निवडणुकीचे गणित बिघडत नाही...

अमित आवारी

अहमदनगर - संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे ( Durga Tambe ) यांनी संग्रहित केलेल्या ओव्यांच्या सहाव्या पुस्तकाचे आज प्रकाशन झाले. या प्रकाशनानंतर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी बोलताना त्यांनी राज्यसभेचे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. ( Balasaheb Thorat said, our Rajya Sabha election arithmetic is not going to go wrong ... )

बाळासाहेब थोरात म्हणाले, राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार संजय पवार उभे आहेत. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष व आमच्या बरोबर असलेले अपक्ष पाहता ही निवडणूक आमच्यासाठी अवघड नाही. प्रेफरेंश वोटिंगमध्ये एकाही मताची चूक चालत नाही. कोणी काही कारणास्तव गैरहजर राहिला तर खूप मोठा परिणाम निकालावर होतो. त्याचे एक गणितच असते. ते गणित बरोबर मांडणे आणि अंमलबजावणी करणे हे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे यात कोणतीही चूक होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नवाब मलिक व देशमुखांना मतदान करता आले नाही तर गणित बिघडेल का असे विचारले असता त्यांनी सांगितले की, आमचे राज्यसभा निवडणुकीचे गणित बिघडत नाही. व्यवस्थित गणित केले आहे आणि गणित यशस्वीपणे सोडविणार आहोत. आम्हाला मदत करणारे अनेक जण आहेत. जे मदत करतील त्यांची मदत आम्ही घेणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

इम्रान प्रतापगडी यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत नाराजी आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना थोरात म्हणाले, मुकूल वासनिक राजस्थानमधून निवडून येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी बनारसमधून निवडून येत आहेत. त्यामुळे नाराज व्हायचे काही कारण नाही. इम्रान प्रतापगडी हे उत्तरप्रदेशातील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याला राजस्थान निवडून देत आहे. यात प्रतापगडींना इथून उमेदवारी दिली आहे. यात वावगे काय आहे. हा देश आहे. कुणातही नाराजी नाही, असे त्यांनी सांगितले.

10 दिवसांत राज्यातील सर्व उसाचे गाळप

राज्यातील शिल्लक उसा बाबत बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात मागील दोन-तीन वर्षे चांगला पाऊस झाला. परिणामी ऊस पीक मोठ्या प्रमाणात झाला. ऊस हे असे पीक आहे ज्यातून शेतकऱ्याला निश्चित रक्कम मिळते. साखर कारखानदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशातील सर्वाधिक साखरेचे उत्पादन महाराष्ट्राने केले आहे. भारत साखर उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आला आहे. ज्यावेळी अंदाजापेक्षा जास्त ऊस निघाला ही वस्तुस्थिती आहे. सरकारने जाणिव पूर्वक या समस्येत लक्ष दिले. उपाय योजना राबविल्या. त्यामुळे आठ ते 10 दिवसांत महाराष्ट्रातील सर्व उसाचे गाळप होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT