Balasaheb Thorat Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Balasaheb Thorat News : बाळासाहेब थोरातांचा निशाणा, ' काँग्रेसची आर्थिक गळचेपी करणे म्हणजे...'

Pradeep Pendhare

Congress News : 'जनतेने लढाई हाती घेतल्याने सत्ताधारी राजा घाबरला आहे. त्यामुळे तो रडीचा डाव खेळू लागलाय. काँग्रेसची खाती गोठवल्यानंतर प्राप्तिकर खात्याची नोटीस म्हणजे, त्याचाच प्रत्यय आहे. काँग्रेसची आर्थिक गळचेपी करण्याचा हा प्रकार म्हणजे, महाराष्ट्रासह देशात मोदीविरोधात लाट असल्याची भाजपने खात्री दिली आहे.' यातूनच निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची बँक खाती गोठवली आणि प्राप्तिकर विभागाची नोटीस पाठवली गेल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला.

काँग्रेसची बँक खाती गोठवल्यानंतर आता प्राप्तिकर विभागाने 2018-19 वर्षांतील प्राप्तिकर चुकवल्याप्रकरणी काँग्रेसची बँक खाती गोठवणाऱ्या प्राप्तिकर विभागाने पक्षाला आणखी 1823.08 कोटी रुपयांचा कर आणि दंड भरण्याची नोटीस बजावली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया सुरू असतानाच करण्यात येत असलेल्या या कारवाईविरोधात काँग्रेसकडून जोरदार हल्ला चढवला गेला आहे. बँक खाती गोठवण्यात आल्यानंतर आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या काँग्रेससाठी प्राप्तिकर विभागाची ही नवी नोटीस मोठा धक्का मानली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणुकीच्या तोंडावर कारवाई झाल्याने या सर्व प्रकारावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. "जनतेच्या हातात लढाई गेल्याने सत्ताधीश राजा घाबरला आहे. जनतेबरोबरच्या लढाईत पराभव दिसू लागल्याने घाबरलेला राजा चुकीच्या गोष्टी करू लागला आहे. काँग्रेस ही लोकचळवळ आहे. निवडणुकीच्या तोंडावर देशातील सर्वात मोठ्या लोकचळवळीची बँक खाती सत्ताधाऱ्यांशी सील केली. बँक खाती सील केल्यानंतर प्राप्तिकरची नोटीस पाठवली आहे. देशातील सूडाचे राजकारण कुठे चालले आहे, हे जनता पाहात आहे.''

तसेच, ''हे राजकारण म्हणजे, दहशत, दडपणाचे, नाकेबंदीचे राजकारण आहे. या दडपशाहीच्या राजकारणाविरोधात जनतेने निर्णय घेतला पाहिजे. देशातील मोठ्या लोकचळवळीच्या मागे जनतेने उभे राहिले पाहिजे", असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

याशिवाय ही निवडणूक जनतेने ताब्यात घेतली आहे. त्यामुळे सत्ताधीश घाबरले आहेत. महाराष्ट्रासह देशात मोदीविरोधात लाट आहे. हे भाजपवाल्यांनी ओळखले आहे. या घबराटीतून ते चुकीच्या कृती करत आहेत. अशा कृतीतून काँग्रेसची(Congress) नाकेबंदी होईल. निवडणुकीच्या प्रचाराला आणि प्रवासालासुद्धा काँग्रेसकडे पैसे नसणार आहेत, परंतु जनता पाठीशी आहे. काँग्रेसने देशासाठी काय बलिदान आणि योगदान दिले आहे, हे जनतेला माहीत आहे. जनतेने लढाई हातात घेतली असल्याने, ही जनतादेखील काँग्रेसच्या या कठीण काळात पाठीशी उभी राहील, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी बोलताना व्यक्त केला.

काँग्रेसची आर्थिक गळचेपी -

काँग्रेसने बँक खाती गोठवल्याच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयाने प्राप्तिकर लवादाकडे दाद मागण्यास सांगितले होते. यातच प्राप्तिकर विभागाने नवी दंडात्मक कारवाई केली. काँग्रेसला ऐन निवडणुकीत पैशाचा वापर करता येणार नसल्याने काँग्रेसची प्रचंड कोंडी झाली आहे. ही आर्थिक गळचेपी असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

Edited by - Mayur Ratnaparkhe

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT