Soniya Gandhi-Sharad Pawar-Raju Shetti
Soniya Gandhi-Sharad Pawar-Raju Shetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

महाआघाडीतून बाहेर पडण्यापूर्वी शरद पवार, सोनिया गांधींना पत्र लिहिले होते : शेट्टी

सरकारनामा ब्यूरो

बारामती : महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्यापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), तसेच खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना कळविले होते. शेतकऱ्यांसदर्भातील अन्यायकारक निर्णयावर त्यांच्याकडून कोणताही निर्णय झाला नाही, त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीशी बोलून मी आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी स्पष्ट केले. (Before leaving maha aaghadi had written letter to Sharad Pawar & Sonia Gandhi : Shetti)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे ता. ५ एप्रिल रोजी झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी त्यांनी राज्यात हुंकार यात्रा काढण्याचे जाहीर केले होते, त्यानिमित्ताने बारामतीत आलेल्या शेट्टी यांनी वरील माहिती दिली. याच वेळी त्यांनी आपण भाजपसोबत जाणार नसल्याचे पुन्हा स्पष्ट केले.

राजू शेट्टी म्हणाले की, शरद पवार यांना ११ फेब्रुवारी रोजी एक पत्र लिहिले होते. त्यात सरकारच्या धोरणाबद्दल आक्षेप नोंदवला होता. तसेच, काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधींनाही पत्र लिहिले होते. शेतकऱ्यांसंबंधी अन्यायकारक निर्णयावर त्यांच्याकडून कोणताही निर्णय झाला नाही, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीशी बोलून मी महाविकास आघाडीतून बाजूला होण्याचा निर्णय घेतला.

भाजपच्या काळातही कृषी कायदे मागे घेताना आठशेहून अधिक शेतकऱ्यांचा बळी गेला. खतांच्या किंमती वाढल्या आहेत, बळीराजा अडचणीत आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही भाजपसोबत कसे जाणार, असा सवाल उपस्थित करत आपण भाजपसोबत जाणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, शेतकरी सर्वच स्तरावर अडचणीत आहेत. उसाचे गाळप वेळेत होत नाही, दुसरीकडे वीजटंचाईचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे. उसाच्या शेतीचा खर्च जवळपास 214 रुपये प्रतिटन वाढला आहे. खत, मजुरी व इतर बाबींमध्ये वाढ झाली आहे. इंधन दरवाढीचे संकट यामुळे ऊसदर परवडेनासा झाला आहे.

एकीकडे सामान्यांचे प्रश्न बिकट होत असताना महागाई वाढते आहे, रोजगाराच्या संधी कमी होत आहेत, याकडे लक्ष देण्याची गरज असताना प्रत्यक्षात ईडी, इन्कम टॅक्स, भोंगा प्रकरण यात सत्ताधारी मश्गुल आहेत. केंद्र आणि राज्यातील विरोधक गप्प आहेत, त्यामुळे हुंकार यात्रेच्या माध्यमातून यावर मार्ग निघावा, यासाठी यात्रा काढण्यात आली आहे. राज्यातील वीजेच्या संकटाबाबत राजू शेट्टी म्हणाले की, कोळसाटंचाई हे कारणच तकलादू आहे. पण खरंच केंद्राकडून राज्यावर अन्याय होत असेल तर मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे आपली भूमिका मांडली पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT