Bharat Patankar, Arun Lad Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Irrigation Department News : जलसंपदा विभागाविरोधात भरत पाटणकर, आमदार लाड एकवटले; दिला मोठा इशारा

Umesh Bambare-Patil

Karad Political News : जलसंपदा विभागाने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांच्या आदेशावरून सहकारी पाणीपुरवठा संस्था व व्यक्तिगत कृषिपंपधारकाला जलमापक मीटर बसविण्याबाबत आदेश देऊन पाणीपट्टी दरात दहापटीने वाढ करून बिले वसूल करण्याचे धोरण चालू ठेवले आहे. त्याविरोधात कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या उत्तरेस पुलाशेजारी 29 मे रोजी सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय नेते आणि शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. आमदार अरुण लाड आणि श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. Irrigation Department News

डॉ. पाटणकर म्हणाले, ‘‘पाणीपट्टी दरात वाढ करण्यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने कोणतीही जनसुनावणी घेतलेली नाही. याविरोधात आम्ही प्राधिकरणास पत्रव्यवहार करून सवलतीचे दर असण्याबाबत मागणी केली होती; परंतु याबाबत काही धोरणात्मक निर्णय घेतला गेलेला नाही.

सहकारी पाणीपुरवठा संस्था व व्यक्तिगत कृषिपंपधारकांना स्वखर्चाने नदीपासून डोंगरकपारीत पाणी सुमारे 200 मीटरपर्यंत पोच करून जिराईत जमीन बागायत करून शासनाचा प्रत्यक्ष महसूल वाढवला आहे. विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यांतील सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे सभासद, शेतकरी व व्यक्तिगत शेतकरी यांचा कोल्हापूर येथील पंचगंगा नदीच्या उत्तरेस पुलाशेजारी दर्ग्याजवळ रास्ता रोको आंदोलन करणार आहोत, असा इशारा पाटणकरांनी दिला आहे.

या आहेत मागण्या

शेतकऱ्यांच्या मालाला जोपर्यंत उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नाहीत, तोपर्यंत शासनाचे जलसंपदाचे दर माफक अथवा पूर्वीचेच ठेवले पाहिजेत. त्यामुळे शासकीय दहापट पाणीपट्टी दरवाढ रद्द करावी, सवलतीच्या दराने पाणीपुरवठा व शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरल्यानंतर राहिलेली मागील थकबाकी रद्द करावी, राज्य शासनाचा पाटबंधारे विभाग जोपर्यंत घनमीटर पद्धतीने पाणी वाटप करीत नाही, तोपर्यंत जलमापक मीटरची सक्ती करू नये, शासनाच्या योजनांवर ज्याप्रमाणे 81 टक्के वीजबिल शासन भरते आणि 19 टक्के शेतकरी त्याप्रमाणे सहकारी पाणीपुरवठा संस्थांची आकारणी करावी आणि त्यातील भ्रष्टाचार थांबवण्यासह 20 टक्के लोकल फंड रद्द करावा.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार लाड म्हणाले, ‘‘अनेक सहकारी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांसाठी पाणी योजना केल्या. 15 ते 20 किलोमीटर पाइपलाइन करून त्या योजना सुरू आहेत. त्यासाठी कारखाने आणि शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. आमच्या हक्काचे पाणी जलसंपदा विभाग आम्हाला विकत घ्यावे लावत आहे. पाण्यासाठी मीटर न बसवता सध्या आहे. त्याच पद्धतीने पाणी देण्यात यावे आणि पाणीपट्टीचा दरही पूर्वीचाच ठेवावा. त्यासाठी कोल्हापूरला रास्तारोको आम्ही करत असून, त्यामध्ये तोडगा न निघाल्यास बेमुदत रास्ता रोको आंदोलन पुढे सुरू ठेवण्यात येईल. यावेळी प्रकाशराव पाटील, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे संपर्क प्रमुख आर. जी. तांबे आदी उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT