Dada Bhude & Farmers
Dada Bhude & Farmers Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मोठी बातमी : पुणतांब्यातील शेतकरी आंदोलन मागे... काय घडले पडद्यामागे?

सूर्यकांत नेटके

अहमदनगर - राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी मागील चार दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. पाच वर्षांपूर्वीही पुणतांबे येथील शेतकऱ्यांनी राज्य सरकार विरोधात आंदोलन केले होते. मात्र हे आंदोलन चिघळले होते. मात्र महाविकास आघाडी सरकारने चारच दिवसांत आंदोलकांची समजूत काढली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. ( Big news: Behind the farmers' movement in Punatamba ... what happened behind the scenes? )

राज्य शासनाचे शेतकरी प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पुणतांबा (ता. राहाता) येथे चार दिवसांपूर्वी सुरू केलेले धरणे आंदोलन आज (शनिवारी) मागे घेण्यात आले. कृषी मंत्री दादा भुसे यांनी आंदोलनकर्त्यांची बंद दाराआड दोन तास चर्चा केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही दूरध्वनीवरून चर्चा केली. नंतर सोमवारी (ता. 6) शेतकरी प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित बैठक घेतली जाणार आहे.

राज्यात सध्या ऊस, कांदा दर, वीज, दूध आदीसह शेतमालाच्या दराचा प्रश्न वरचेवर अधिक गंभीर असताना शेतकरी प्रश्नाची सोडवणूक करण्याएवजी केंद्र व राज्य सरकार एकमेकांवर चालढकल करत आहेत. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी एतिहासिक शेतकरी संप पुकारणाऱ्या पुणतांबे (ता. राहाता) येथील गावकऱ्यांनी पुन्हा एकदा शेतकरी प्रश्नावर एल्गार पुकारला आहे.

पंधरा दिवसापुर्वी बैठक घेऊन व 23 मे रोजी ग्रामसभा घेऊन उसाला एकरी एक हजार रुपये अनुदान द्यावे, शिल्लक उसाला हेक्टरी दोन लाख रुपये द्यावे, कांद्यासह सर्व पिकांना हमीभाव द्यावा. कांद्याला प्रतिक्विंटल पाचशे रुपये अनुदान द्यावे, शेतकऱ्यांना दिवसा पूर्णदाबाने वीज मिळावी. थकीत वीजबिल माफ झाले पाहिजे, कांदा आणि गव्हाची निर्यात बंदी उठवावी. सर्व पिकांना आधारभूत किंमत दिली जावी त्यासाठी आयोगाची स्थापना करून निर्णय घ्यावा, 2017 साली केलेल्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी. नियमित कर्ज भरणारांचे अनुदान दिले जावे, दुधाला उसाप्रमाणे एफआरपी लागू केला जावा. दुधाला कमीतकमी चाळीस रुपये दर दिला जावा. खासगी दूध संकलन केंद्रात होणारी लुट थांबवावी, वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास भरपाई दिली जावी. शेतकरी आंदोलनात दाखल गुन्हे मागे घेतले जावे, वन हक्क कायद्यानुसार आदिवासींना जमिनी नावावर केल्या जाव्यात यासह मागण्यांसाठी पुणतांबा येथील नागरिकांनी ग्रामसभा घेऊन राज्य शासनाला निवेदन दिले.

सात दिवसानंतरही दखल घेतली नसल्यामुळे बुधवार (ता. 1 जून) पासून गावकर यांनी धरणे आंदोलन सुरू केले होते दोन दिवसापूर्वी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अंदोलनाला भेट दिली होती. आज (शनिवारी) सकाळी दहा वाजता कृषीमंत्री दादा भुसे, खासदार सदाशिव लोखंडे यांनी पुणतांबा येथे भेट देऊन अंदोलनातील समितीच्या सदस्य सरपंच डाॅ. धनंजय धनवटे, सुभाष वहाडणे, सुहास वहाडणे, धनंजय जाधव, बाळासाहेब चव्हाण, नामदेव वहाडणे, सुभाष कुलकर्णी आदीशी दोन तासांपेक्षा अधिक काळ बंद दाराआड चर्चा केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणे करून दिले शेतकरी प्रश्नावर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बैठक होणार असल्याचे सांगून धरणे आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर करण्यात आले. मंत्री भुसे आज पुणतांबाला भेट देणार असल्याने गावातील चारशेपेक्षा अधिक नागरिक उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT