Chief Minister Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Eknath Shinde Big Decision : मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांकडून आषाढी वारीतील समन्वय साधण्यासाठी 'या' दोन मंत्र्यावर विशेष जबाबदारी

सरकारनामा ब्यूरो

Pandharpur : आषाढी एकादशीच्या निमित्ताने दक्षिण काशी म्हणून ओळख असणारं पंढरपूर शहर हे संपूर्ण भक्तिमय होणार आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होतात. त्यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. याचवेळी पंढरपूरात मोठ्या संख्येनं येणाऱ्या वारकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन मंत्र्यांची नियुक्ती केली आहे.

येत्या गुरुवारी(दि.२९) आषाढी एकादशी आहे. यानिमित्ताने राज्यभरातील दिंड्या पंढरपुरात दाखल होत आहेत. यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण ठाकुरबुवा समाधी येथे संपन्न झाले. गोल रिंगणाचा नेत्रदीपक सोहळा पार पडल्यानंतर माऊली आणि संत सोपानकाका या दोन भावंडांची भेट पंढरपूर तालुक्यातील टप्पा येथे झाली. तर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे मुक्कमी आली आहे. तर जवळपास ६५० किलोमीटरचा पायी प्रवास करून संत मुक्ताईची पालखी पंढरीत दाखल झाली. आता वारकऱ्यांना सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागलेली असून पावलांनी पंढरपुरात पोहचण्यासाठी वेग घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरात मोठ्या संख्येनं येणाऱ्या वारकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती केली आहे. यात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे दोन मंत्री समन्वयक मंत्री म्हणून भूमिका निभावणार आहे. आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहेत. अनेक वारकरी बस किंवा इतर वाहनांनी विठुरायाच्या दर्शनासाठी येत आहेत. २९ जूनला विठुरायाची महापूजा केली जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांकडून चार दिवस पाहणी...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहराचा आणि परिसरातील पूर्व तयारीचा आढावा घेतला. यावेळी कामात त्रुटी आढळल्याने मुख्यमंत्री शिंदेंनी सोलापूर जिल्हाधिकारी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडसावलं. वारकरी पंढरपुरात(Pandharpur) दाखल होण्याआधी सर्व कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

आषाढी एकादशी (Ashadhi Ekdashi) वारीसाठी राज्यातून येणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी रस्ते, पाणी, स्वच्छता आणि इतर सोयी सुविधा पुरवण्यात कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही. तसेच पंढरपुरकडे येणाऱ्या रस्त्यांवर कुठेच खड्डे दिसले नाही पाहिजे सर्व रस्ते एक समांतर पातळीवर करा, रस्त्यात कुठेही कमी जास्त किंवा वर खाली स्तर नको. पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

असे शिंदे पहिलेच मुख्यमंत्री...

आषाढीनिमित्त पाहणी करण्यासाठी आलेले एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे पहिलेच मुख्यमंत्री आहेत. तसेच त्यांनी पंढपुरात आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचा देखील आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी दर्शन रांगेत जाऊन भक्तांशी देखील संवाद साधला. त्यानंतर मंदिर परिसर, भक्तांसाठी निवासासाठी योजना करण्यात आलेल्या 65 एकर तळाची पाहणी करुन ते परत गेले. दरम्यान वारकऱ्यांना दिलेल्या सुविधांसाठी ते खूश असून त्यामुळे आपण देखील समाधानी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT