<div class="paragraphs"><p>Jalindar Wakchaure</p></div>

Jalindar Wakchaure

 

Sarkarnama

पश्चिम महाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यात शिक्षक भरतीत मोठा घोटाळा!

शांताराम काळे

अकोले ( अहमदनगर ) : अहमदनगर जिल्हा परिषदेत सध्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. या जिल्हा परिषदेत 2013मधील शिक्षक भरतीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप जिल्हा परिषदेतील भाजपचे ( BJP ) गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत नवीन राजकीय वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. Big scam in teacher recruitment in Ahmednagar district!

जालिंदर वाकचौरे यांनी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, टीईटी परीक्षेपेक्षाही अहमदनगर जिल्ह्यात शिक्षक भरतीत मोठा घोटाळा होऊन करोडोंची उलाढाल झाली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

वाकचौरे यांनी पुढे म्हंटले आहे की, सध्या टीईटी परीक्षेचा घोटाळा गाजतो आहे. परंतु यापेक्षाही मोठा शिक्षक भरती घोटाळा महाराष्ट्रात झाला आहे. पण दुर्दैवाने त्याची चर्चा झाली नाही. टीईटी पास नसलेले हजारो शिक्षक सेवेत घेण्यात आले आहेत. टीईटीची अट 2013 साली लागू झाली व 2013 साली शिक्षक भरती बंद झाली. यातून पळवाट काढत हे शिक्षक 2012 पूर्वी आमच्या शाळेत काम करत होते, असे रेकॉर्ड तयार करून अधिकाऱ्यांना पैसे देऊन शिक्षकांना मान्यता मिळवल्या. त्यानंतर हजारो शिक्षक सेवेत रुजू केले आहेत, असे प्रत्येक जिल्ह्यात 500 पेक्षा जास्त शिक्षक आहेत.

या घोटाळ्याची पद्धत अशी की शिक्षकांच्या सह्या असलेले हजेरी पुस्तक 2012 पूर्वीपासून दाखवायचे आणि ते शिक्षक 2012 पासून नोकरीत होते; त्यामुळे ते शिक्षक भरतीपूर्वी कामाला होते असे रेकॉर्ड तयार करायचे. त्याला शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता मिळवली. याला मंत्रालय स्तरावरून मान्यता दिल्या गेल्या. हे शिक्षक नववी व दहावीला शिकवत होते, असे दाखवून टीईटीतून सूट मिळवून घेतली (टीईटी आठवीपर्यंत असते). म्हणजे टीईटी पास होण्याचीही किंमत वसूल केली व टीईटी लागू नसण्याचेही पैसे वसूल करण्यात आले. त्यानंतर या शिक्षकांना शालार्थ आयडी देण्यासाठी स्वतंत्र पैसे घेतले गेले आणि पगार सुरू करण्यासाठी पैसे घेतले.

त्यानंतर त्यांच्या पूर्वीपासून नोकरीत जाते म्हणून लाखो रुपयांच्या पगाराचे फरकही काढण्यात आले, त्यातही अधिकाऱ्यांनी टक्केवारी घेतली. गरीब कुटुंबातील अनेक तरुण शिक्षक यात भरडले गेले असून त्यांना जिल्हा शिक्षणाधिकारी ते मंत्रालय असा किमान 15 लाखांपर्यंत खर्च आला आहे. शिक्षण संस्थेने घेतलेले पैसे पुन्हा वेगळेच, जवळपास 20 ते 25 लाख रुपये देऊन या नोकऱ्या मिळाल्या आहेत. यातील अनेक शिक्षकांनी कर्ज काढले आहे. ते कर्जबाजारी झाले आहेत. हा घोटाळा इतका व्यापक आहे की प्रत्येक जिल्ह्यात ही संख्या किमान 500 ते 1000 असावी असा अंदाज आहे. इतके शिक्षक गुणिले किमान 10 लाख धरले तरी या घोटाळ्याचा अंदाज येईल. हा घोटाळा कदाचित टीईटीलाही मागे टाकू शकेल, अशी शक्यता वाकचौरे यांनी व्यक्त केली आहे.

घोटाळा असा होतो उघड

हा घोटाळा उघड करण्याचा सोपा मार्ग म्हणजे 2012 नंतर शिक्षक भरती बंद असताना 2012 नंतर जिल्ह्यात नवे शिक्षक किती भरती झाले ही संख्या घेतली की हा घोटाळा उघड होतो. त्याकाळात अतिरिक्त शिक्षक उपलब्ध असताना व शिक्षक भरती बंद असतानाही शिक्षक भरती झाली कशी ? टीईटी पास नसताना हे शिक्षक या व्यवस्थेत कसे आले ? हा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारायला हवा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT