Ramraje Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची घाई : रामराजे

किरण बोळे

फलटण शहर : महाराष्ट्रात सत्ता बदलासाठी प्रयत्नशील असलेल्या मंडळींनी केवळ राजकीय हेतूने खासदार शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थनावर हल्ला घडवून आणून राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा निंदनीय प्रकार केला आहे. या प्रयत्नाद्वारे त्यांना महाराष्ट्र सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट आणून सत्ता बदलाची घाई झाली आहे, अशी टीका विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे.

खासदार शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या मुंबई येथील निवासस्थानावरील हल्ल्याच्या निषेधार्थ सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील "लक्ष्मी - विलास पॅलेस" या निवासस्थानाच्या प्रांगणात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला. यावेळी 'राष्ट्रवादी'च्यावतीने फलटण बंदचे आवाहन करत मोर्चा काढून प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माणिकराव सोनवलकर, माजी कृषी सभापती मंगेश धुमाळ, धैर्यशील अनपट, डी. के. पवार, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, श्रीराम बझारचे अध्यक्ष जितेंद्र पवार, प्रा. भीमदेव बुरुंगले, माजी सभापती सौ. रेश्मा भोसले, सौ. लतिका अनपट, सौ. राजश्री शिंदे, माजी उपनगराध्यक्ष नितीन भोसले, आदी उपस्थित होते.

सभापती रामराजे म्हणाले, ''महाराष्ट्रात राजकीय हेतूने आंदोलनापेक्षा लोकांच्या प्रश्नांसाठी झालेली आंदोलने तुम्हा आम्हास सर्वांनाच ज्ञात आहेत. तथापि, खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा हेतू एसटी कामगारांच्या प्रश्नापेक्षा राजकीय हेतूने झाल्याचे एकूण परिस्थितीवरून स्पष्ट दिसते. वास्तविक खासदार शरद पवार यांनी पन्नास वर्षाच्या राजकीय वाटचालीत कष्टकरी व श्रमिकांचीच बाजू घेतल्याचे अनेक उदाहरणे समोर आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ही त्यांची भूमिका सौहार्दाची असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत त्याच प्रमाणे ऊस तोड मजुरांपासून अन्य कष्टकऱ्यांच्या बाबतीत त्यांना न्याय देताना प्रसंगी शासन अथवा संबंधित संस्थांवर किती बोजा पडला, या पेक्षा कष्टकऱ्यांना न्याय देण्याला प्राध्यान दिल्याचे दिसते. आताच्या एसटी संपातही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या समवेत अनेक बैठका घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला आहे.

त्यामुळे खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ला घडवून आणण्यात राजकीय हेतू स्पष्ट दिसून येत आहे. चौकशीनंतर हे सर्व निश्चितपणे समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या बैठकीनंतर उपस्थित सर्व नेते कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून खासदार शरद पवार यांच्या निवसस्थानावरील हल्ल्याचा निषेध करीत मोर्चा काढला. या घटनेचा निषेध करणारे निवेदन प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना देवून आमच्या भावना राज्यपालांपर्यंत पोचवाव्यात अशी विनंती करण्यात आली.

अपप्रवृत्तींना धडा शिकवा...

शरद पवार ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यांच्या निवासस्थानावर भ्याड हल्ला ही दुर्दैवी घटना. पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात महापुरुषांच्या विचारांना हरताळ फासणारी ही घटना. पवारांवर टीका करा व महत्वाची पदे मिळवा हा आता धंदा झाला आहे. अशा अपप्रवृत्तींना धडा शिकवायची वेळ आता आली असल्याचा इशारा जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT