Eknath Shinde and Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bjp News : 'मुख्यमंत्री कैसा हो, देवेंद्रजी जैसा हो'; भाजपच्या सभेत घोषणा, शिंदे गट पेचात

Vishal Patil

Bjp Sabha Karad Satara News :

राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मोठे राजकीय बदल पाहायला मिळाले. अनपेक्षितपणे महाविकास आघाडी स्थापन झाली. आघाडीत उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पदासाठी अनपेक्षितपणे नाव समोर आले. महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षात उलटविण्यात यश आल्यानंतर महायुतीचे सरकार आले. शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली.

भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पाहिजे होते. तडजोडीनंतर आता आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकी अगोदर पुन्हा केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशा घोषणा ऐकू येवू लागल्या आहेत. आता पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच, या घोषणेमुळे शिवसेना Eknath Shinde गटापुढे मोठा पेच निर्माण होताना दिसत आहे.

सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित जाहीर सभा झाली. या सभेत आमदार जयकुमार गोरे, भाजप सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी जोरदार बॅंटींग करत मुख्यमंत्रीपदी पुन्हा देवेंद्र फडणवीसच पाहिजेत, असे जाहीरपणे सांगितले. मंत्री रवींद्र चव्हाण यांना मतदारसंघात दादा म्हणतात, असे म्हणत डॉ. अतुल भोसले यांनी तीनवेळा त्यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा देताना ते म्हणाले, 'राज्य का मुख्यमंत्री कैसा हो देवेंद्रजी जैसा हो'.  

'देवेंद्र फडणवीस त्याग पुरूष'

महाराष्ट्राने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठीच मतदान केले. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र याच घोषणेवर लोकांनी मतदान केले. परंतु, निवडणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीचे राजकारण झाले, असे राजकारण इतिहासात कधी झाले नव्हते. निवडणूक एकासोबत आणि सत्ता दुसऱ्यासोबत अडीच वर्षे पाहिली. घरात बसून काम करणारा मुख्यमंत्री बघितला. राज्यात अनेक स्थितंत्यरे पाहिली अन् देवेंद्र फडणवीसांच्या अथक प्रयत्नानंतर पुन्हा एकदा राज्यात सरकार आले. सगळ्यांनी त्याग पुरूष म्हणून फडणवीसांना अनुभवलं आहे, असे आमदार जयकुमार गोरे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फडणवीस लोकांसाठी, जनतेसाठी, राज्यासाठी काम करतात. याठिकाणी त्यांनी सर्वप्रथम कार्यकर्त्याला मानलं, पक्षाला मानलं. जनतेने मुख्यमंत्री म्हणून कौल दिला होता. परंतु, पक्षाला, कार्यकर्त्याला आणि महाराष्ट्राला न्याय मिळाला पाहिजे म्हणून चुकीची भूमिका घेवून आलेलं महाविकास आघाडीचं सरकार घालविण्यासाठी त्याग केला. देवेंद्र फडणवीसांनी स्वतः 10 पाऊल मागं येवून त्याग केला अन् एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं आणि उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं. त्यामुळे फडणवीस त्याग पुरुषच असल्याचे आमदार गोरे म्हणाले. 

शिंदे गटापुढे मोठा पेच

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप नेत्याकडून जाहीरपणे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले जात आहे. पुढील काळात मुख्यमंत्री भाजपचा होण्याची शक्यता आहे. राज्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे शिंदे गट कोणती भूमिका घेणार? याकडे लक्ष असून मोठा पेच निर्माण झाला आहे.

edited by sachin fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT