Nagar urban bank
Nagar urban bank Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नगर अर्बन बॅंकेच्या दीडशे कोटींच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर ( जि. अहमदनगर ) - अहमदनगर शहरातील सुमारे शंभर वर्षांपूर्वीची असलेली नगर अर्बन बँक ( Nagar Urban Bank ) सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेतील आर्थिक व्यवहारांवर निर्बंध आणत संचालक मंडळाचे अधिकार गोठविले आहेत. अशातच आता बँकेच्या माजी संचालकांच्या फिर्यादीनुसार 150 कोटींच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

नगर अर्बन बॅंकेच्या 2014 ते 2019 या काळात संचालक व अधिकाऱ्यांनी बॅंकेची, खातेदारांची व सभासदांचा विश्‍वासघात सुमारे 150 कोटी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बॅंकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन अध्यक्ष, संचालक सदस्य, कर्जदार, बॅंकेचे अधिकारी व मुख्य शाखेचे व्यवस्थापक आदींवर गुन्हा दाखल झाला आहे.

माजी संचालक राजेंद्र गांधी हे 1984 पासून बॅंकेचे सभासद व खातेदार आहेत. सन 2008 ते 2014 या कालावधीत ते बॅंकेचे संचालक होते. बॅंकेच्या दरवर्षी होणाऱ्या वैधानिक लेखापरीक्षणाचे त्यांना माहिती आहे. बॅंकेतील अनेक गैरव्यवहार त्यांनी बाहेर काढलेले आहेत.

2015 पासून नगर अर्बनची मुख्य शाखा व इतर कार्यालयांमध्ये झालेल्या गैरव्यवहारांमुळे सभासदांना लाभांश व ठेवीदारांना त्यांचा परतावा, ठेवीची रक्कम व त्यांच्या इतर खात्यातील रकमा परत मिळत नाहीत. बॅंकेच्या संचालक मंडळ, वरिष्ठ अधिकारी, काही कर्जदार व इतर संबंधित व्यक्तींनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार करून बॅंकचे अपरिमित नुकसान केले आहे.

गांधी यांनी याप्रकरणी प्रशासक, रिझर्व बॅंक, तसेच पोलिस अधीक्षकांशी वेळोवेळी पत्रव्यवहार करून दोषींवर कारवाईची मागणी केली होती. तसेच औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षकांना आदेश देण्याची मागणी केली होती. त्यांनतर डॉ. नीलेश शेळके व इतर डॉक्‍टरांचे 23 कोटी 90 लाख रुपयांचे कर्जप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

शेवगाव पोलिस ठाण्यात बनावट सोने तारण प्रकरणी पाच कोटी 30 लाख रुपये कर्जप्रकरणाबाबत, चिंचवड पोलिस ठाण्यात पिंपरी चिंचवड शाखेतील 22 कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणाबाबत गुन्हे दाखल आहेत. याशिवाय आतापर्यंतच्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालानुसार आणखी गैरव्यवहार व घोटाळे समोर आले आहेत. बॅंकेने करमाळ्याच्या यशतमराज वाईनरी कंपनीला कर्ज मंजूर केले, पण ही कंपनीत अस्तित्वात नाही.

विविध प्रकारची नियमबाह्य, बनावट कर्जप्रकरणे करून, तसेच सोने तारण व्यवहारात बॅंकेची एकूण सुमारे दीडशे कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे गांधी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

हे आहेत आरोपी बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष व दिवंगत खासदार दिलीप गांधी, त्यांचे निकटवर्तीय आशुतोष सतीश लांडगे, सचिन गायकवाड, रेणुकामाता मल्टीस्टेट सोसायटी व बॅंकेचे तत्कालीन मुख्य शाखा व्यवस्थापक अच्युत घनश्‍याम बल्लाळ यांच्यावर फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर करणे, बनावट कागदपत्रे खरे म्हणून वापरणे, आदी कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT