Chandrahar Patil On Maharashtra Kesari Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maharashtra Kesari : पृथ्वीराज मोहोळ-शिवराज राक्षे पुन्हा भिडणार? 25 लाखांचे मानधन; महाराष्ट्र केसरीतील वाद संपवण्यासाठी चंद्रहार पाटलांचा पुढाकार

Chandrahar Patil On Maharashtra Kesari : अहिल्यानगर येथे 2 फेब्रुवारीला झालेल्या महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धेत मोठा गोंधळ झाला. ज्यामध्ये पृथ्वीराज मोहोळने पैलवान शिवराज राक्षेवर विजय मिळवल्याचा निकाल देण्यात आला. हाच निकाल आता वादाचे कारण ठरले आहे.

Rahul Gadkar

Sangli News : अहिल्यानगरमधील महाराष्ट्र केसरी स्पर्धेत निर्माण झालेल्या वादात डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी उडी घेतली. तर शिवराज राक्षे यांने पंचाला लाथ न घालता गोळ्या घालायच्या पाहिजे होत्या अशी संतप्त टीका केली होती. ज्यानंतर चंद्रहार पाटलांनी पुन्हा एकदा यावरून भाष्य करताना, शिवराज राक्षे आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यावरील निलंबन रद्द करा अन्यथा आपण मानाच्या गदा परत करू असा इशारा दिला होता. यामुळे महाराष्ट्र केसरीचा वाद आणखीन चिघळला होता.

यानंतर आता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंचांच्या चुकीच्या निकालामुळे निर्माण झालेला वादावर पडदा टाकण्यासाठी चंद्रहार पाटलांनीच पुढाकार घेतला आहे. यासाठी सांगलीच्या मातीत पै. पृथ्वीराज मोहोळ आणि वादाच्या केंद्रस्थानी असलेला मल्ल पै. शिवराज राक्षे यांच्यात लढत निश्चित करण्यात आली आहे. या लढतीला दोन्ही मल्लांनी हिरवा कंदिल दाखवला आहे. महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यातील वाद सांगलीत संपेल, असा विश्वास चंद्रहार यांनी व्यक्त केला आहे.

चंद्रहार पाटील म्हणाले, ‘‘सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणावर हे मल्लयुद्ध होईल. त्यादृष्टीने आम्ही तयारीला सुरवात केली आहे. शिवराज लढायला तयार होताच, आज पृथ्वीराज मोहोळ यानेदेखील होकार दिला आहे. कुस्ती शौकिनांच्या मनात महाराष्ट्र केसरी आखाड्यात चुकीच्या निकालानंतर निर्माण झालेल्या वादातून जी सल आहे, ती दूर होईल. शौकिनांना एक चांगली कुस्ती पहायला मिळेल आणि वाद बाजूला ठेवून मल्ल नेहमी पुढे जात असतात, हा संदेश महाराष्ट्रभर जाईल.

एका पंचाच्या पाच सेकंदाच्या चुकीच्या निकालाने शिवराज राक्षे यांच्या करिअरला मोठा धक्का बसला आहे. मात्र या घटनेने महाराष्ट्रातील कुस्ती बदनाम होऊ नये, याची काळजी घेणे आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी हे मल्लयुद्ध आवश्यक होते. त्यासाठी मी पुढाकार घेतला आहे.’’

ते म्हणाले, दोन्ही मल्लांनी अत्यंत सकारात्मक विचाराने या कुस्तीसाठी होकार दिला आहे. त्यांना प्रत्येकी 25 लाख रुपयांचे मानधन आम्ही देणार आहोत. वाद या दोन मल्लांचा नव्हता आणि नसेल. दोघांनीही कुस्तीची सेवा केली आहे, पुढेही करणार आहेत. त्यांच्यातील या लढतीमुळे त्यांच्या मनावरील दडपणदेखील दूर होईल. सध्या निर्माण झालेले मतभेद, मनभेद दूर होतील, अशी अपेक्षा आहे.’’

दोन-दोन स्पर्धा कशाला?

चंद्रहार पाटील यांनी ‘महाराष्ट्र केसरी’ ही अत्यंत मानाची स्पर्धा असून राजकीय वाद, श्रेयवादातून दोन-दोन स्पर्धा होणे योग्य नाही, अशी भूमिका मांडली आहे. कुस्ती क्षेत्रातील राजकीय वाद बाजूला ठेवून महनिय नेत्यांनी एकविचाराने किमान या मानाच्या स्पर्धेचे सर्वोच्च स्थान अबाधित ठेवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT