Chandrakant Patil | Narendra Modi sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandrakant Patil : मोदींना लोकसभेत कमी जागा मिळाल्यानं जग हळहळलं; चंद्रकांत पाटलांचं अजब विधान

Akshay Sabale

Kolhapur News, 11 June : लोकसभा निवडणुकीदरम्यान ( Lok Sabha Election 2024 ) भाजपनं '400 पार'चा नारा दिला होता. पण, भाजपच्या '400 पार'च्या नाऱ्यावर पाणी फेरलं आहे. भाजपला '300 पार'ही करता आलं नाही. भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत. तर 'एनडीए'ला 294 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

2014 आणि 2019 मध्ये भाजपनं ( Bjp ) स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल, असे खासदार होते. पण, आता भाजपला मित्रपक्षांच्या मदतीनं सत्ता स्थापन करावी लागत आहे. यातच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली आहे. मोदींना कमी जागा मिळाल्यानं जग हळहळलं आहे, असं चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

मोदी सरकार जास्त काळ टिकेल, असं वाटत नसल्याचं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. याबद्दल विचारल्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, "आशावाद हा प्रत्येकाला असलाच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही संघर्ष करत नाही. आणि दुसऱ्याला संघर्ष करण्यासाठी प्रवृत्त करत नाही. नेत्यानं कार्यकर्त्यांना संघर्ष करण्यासाठी प्रोत्साहन करायचं असतं."

"पण, अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार 24 पक्षांना बरोबर घेऊन स्थापन करण्यात आलं होतं. ते सरकार साडेचार वर्षे टिकलं आणि चाललं. शेवटचे सहा महिने राहिलेले. लवकर निवडणुका घ्यावात असं वाजपेयी यांना वाटलं. निवडणुका घेतल्या आणि अंदाज चुकला. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्यानंतर रोजच सरकार पडेल, असं शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले सुद्धा म्हणायचे. पण, काहीच फरक पडला नाही. तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत," असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.

"मोदींचं नेतृत्व आश्वासक आहे. मोदींना लोकसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्यानं जग हळहळलं आहे. गेल्या काही दिवसांत भाजपचे मित्रपक्ष फोडण्यासाठी कमी प्रयत्न झाले का? पण, भाजपचं सरकार स्थापन झालं. त्यामुळे सरकार अडचणीत येईल असं वाटत नाही," असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं.

"लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. काही कारणानं उमोदवारी घोषित करण्यास उशीर झाला. ती गोष्ट लक्षात घेऊन यावेळी नक्कीच दुरूस्ती होईल," असं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT