Harshvardhan Patil-Chandrakant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांच्या भाजप सोडण्यावर चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया : ‘मला काय मिळणार, हा विचार..’

विश्वभूषण लिमये

Solapur, 03 October : विशिष्ट वयामध्ये आपण भारतीय जनता पार्टीमध्ये आलो, तिथे आपणाला प्रेम मिळालं, त्या पार्टीबरोबर आपण उर्वरित आयुष्यभर राहिलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण, ज्यांना ज्यांना असं वाटतं की भाजपमध्ये आपल्याला तिकीट मिळणार नाही, ते दुसऱ्या पक्षाचा आधार घेत आहेत. समाजाला आणि जगाला काय मिळणार, यापेक्षा मला काय मिळणार, असा विचार करणारे जरा जास्तच आहेत, अशा शब्दांत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या निर्णयावर भाष्य केले.

माजी सहकार मंत्री तथा राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या मुलांनी आपल्या सोशल मीडियावर तुतारी वाजविणारा माणूस हे स्टेट्स ठेवले आहे. त्याबाबत सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.

चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) म्हणाले, राजकारणात महत्वकांक्षा निष्ठेच्या वर आली, तर त्याला काही पर्याय नाही. पण, यात काही दोष आहे, असं मी म्हणत नाही. माझ्यावर व्यक्तीशः अन्याय झाला असेल तरीही मी पार्टी सोडणार नाही. ज्यांना ज्यांना असं वाटतं की भाजपमध्ये आपल्याला तिकीट मिळणार नाही, ते दुसऱ्या पक्षाचा आधार घेत आहेत. त्यांनी ते करू नये, असं केवळ आवाहन मी करू शकतो.

हर्षवर्धन पाटील हे भाजप सोडून चालले आहेत, त्यामुळे मी त्याच्यावर टीका करावी, असा माझा स्वभाव नाही. एका पार्टीत राहण्याचं मानसिक समाधान वेगळं असतं आणि लोकांमध्येदेखील प्रतिमा चांगली राहते, असेही त्यांनी नमूद केले.

ते म्हणाले, समाजाला आणि जगाला काय मिळणार, यापेक्षा मला काय मिळणार, असा विचार करणारे जरा जास्तच आहेत. समरजित घाटगे किंवा हर्षवर्धन पाटील यांच्यावर मी टीका करत नाही. पण, हे प्रमाण सध्या वाढत चालले आहे. त्यांना फडणवीसांकडून मिळेल, अशी अपेक्षा होती म्हणून ते भाजपत आले. पण आता त्यांना असा आभास होतो की, पवारांकडून मिळेल.

शरद पवारांना टोला

जेव्हा निवडणुकांचा निकाल लागेल तेव्हा पार्टी तेव्हा त्यांना पुन्हा पक्षात घेईल का, याचा निर्णय निकालानंतर पार्टी घेईल. संधीसाधूपणाची सुरुवात आत्तापासूनची नाही. ती 1978 ते 80 च्या दरम्यान सुरू झाली आहे. सत्ता परिवर्तन करण्यासाठी आणि स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी 1980 मध्ये संधीसाधूपणाची सुरुवात झाली. अशा शब्दांत नाव न घेता चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना टोला लगावला.

पुन्हा सगळे भानावर येतील

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, अलीकडच्या काळामध्ये एका पार्टीतून दुसऱ्या पार्टीमध्ये उड्या मारण्याचे प्रमाण वाढले आहे. राजकारणामध्ये जो जो येतो, त्याला सत्ता स्थान मिळवण्याची घाई झालेली असते. ते पेशंस नसल्यामुळे मग जी निवडणूक येईल, त्यात मला संधी द्या, असं म्हणणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. पण, तिकीट जाहीर झाल्यानंतर सगळे पुन्हा भानावर येतात.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT