Eknath Shinde On Barsu
Eknath Shinde On Barsu  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Eknath Shinde On Barsu : मुख्यमंत्री शिंदेंचं बारसु रिफायनरी प्रकल्पाबाबत सूचक वक्तव्य; म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

Satara News : रत्नागिरी येथील बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी सर्वेक्षण सुरु झालं आहे. या सर्वेक्षणाला स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध दर्शविला जात आहे. याचवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आहेत. सरकारकडून प्रकल्पासाठी स्थानिक नागरिकांवर दडपशाही सुरु असल्याची टीका केली जात आहे. याचवेळी आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारसू प्रकल्पाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde)हे त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या मुळ गावी दोन दिवस आले होते. काल दिवसभर त्यांनी विविध विकासकामांचं भूमिपूजन व अधिकार्यांसोबत आढावा बैठक घेतल्या. त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.यावेळी शिंदे यांनी बारसू प्रकल्पाविषयी सुरु असलेल्या संघर्षावर भाष्य केलं आहे.

शिंदे म्हणाले, स्थानिक नागरिकांच्या संमतीशिवाय बारसु रिफायनरी प्रकल्प( Barsu Refinery Protest) केला जाणार नाही. रेटून आणि अन्याय करू हा प्रकल्प केला जाणार नाही. केवळ त्यांचे मुख्यमंत्री पद गेल्याने विरोध करायचा म्हणून हे सर्व चालले आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. दरम्यान त्यामुळे दोन वर्षे घरी बसलेल्यानी आमच्यावर बोलावे, हे नवलच आहे, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेसह विरोधकांवर केली.

दोन दिवस मुख्यमंत्री रजेवर गेल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. याविषयी एकनाथ शिंदे म्हणाले, मी गावी आलो असलो तरी माझे काम सुरूच आहे, मी महाबळेश्वर रस्त्याचे भूमिपूजन केले, महाबळेश्वर ला अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली, अधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्री घेतात त्यावेळी विविध कामांना चालना मिळते, त्यामुळे दोन वर्षे घरी बसलेल्यानी आमच्यावर बोलावे, हे नवलच आहे अशी टीकाही केली.

मुख्यमंत्री पद गेल्याने...

एकनाथ शिंदे म्हणाले, नाणार प्रकल्पाला विरोध झाल्यानंतर बारसु येथे हा प्रकल्प व्हावा व महाराष्ट्रात हजारो कोटींची गुंतवणूक व्हावी, लोकांना रोजगार मिळावा मुळात ही ग्रीन रिफायनरी असून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केंद्रातील सरकारला पत्र पाठवून बारसु येथे हा प्रकल्प व्हावा, यासाठी त्यांनीच हिरवा कंदील दिला होता. त्यावेळी काय विशिष्ट परिस्थिती होती का, काही तडजोडी झाल्या होत्या काय, त्यामुळे त्यांनी परवानगी दिली आहे. मग आता मुख्यमंत्री पद गेल्याने विरोध करायचा म्हणून हे सर्व चालले आहे.

हा विरोधकांचा दुटप्पीपणा...

समृद्धी महामार्गालाही विरोध झाला. त्यावेळी मी जिद्दीने तो मार्ग पुढे नेला आणि पूर्ण केला. त्याला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असे नामकरण केले आहे, हा गेम चेंजर प्रकल्प आहे. त्यालाही विरोध केला चांगल्या कामांना विरोध करणे हा विरोधकांचा दुटप्पीपणा आहे. त्यामुळे विरोधकांनी चांगल्या कामांना साथ दिली पाहिजे.

स्थानिक नागरिकांच्या संमतीशिवाय...

आता केवळ माती परीक्षण केले जाऊन स्थानिक नागरिकांच्या संमतीने बोअर घेतले जात आहेत, त्यानंतर ठरणार की हा प्रकल्प तेथे होणार की नाही. त्यामुळे चांगला प्रकल्प होत असेल तर विरोध कश्यासाठी असा प्रश्न करून स्थानिक नागरिकांच्या संमतीशिवाय हा प्रकल्प केला जाणार नाही. रेटून आणि अन्याय करून हा प्रकल्प केला जाणार नाही.समृद्धी मार्गालाही बिरोध झाला पण येथेही लोकांची समत्ती मिळाल्यास विरोध करणारे मागे पडले तसेच येथेही होईल असे त्यांनी स्पष्ट केलं.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT