Radhakrishna Vikhe Patil, Balasaheb Thorat  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar Crime : विखे-थोरातांच्या जिल्ह्यात चाललयं काय ? याला नेतेचं जबाबदार..

सरकारनामा ब्युरो़

-राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : नेहमीत राजकीय घडामोडींमुळे चर्चेत असलेला नगर जिल्हा सध्या विविध गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमुळेही चर्चेत आहे. एकूणच जिल्ह्यात आणि अहमदनगर शहरांमध्ये गुन्हेगारी वाढत असून गंभीर घटनांच्या नोंदी रोजच्या रोज होताना दिसत असताना पोलीस यंत्रणा काय करीत आहे, असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे.

मोठ्या क्षेत्रफळ असलेल्या या जिल्ह्यात अवैध व्यवसाय, गुन्ह्यांची संख्याही त्याच प्रमाणात मोठी आहे. एकूणच वाढती गुन्हेगारीला पोलीस आळा घालण्यात अयशस्वी ठरले आहेत. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या नगर शहरात तर खुनाची हादरवून टाकणारी घटना, धारदार शस्त्रे सापडणे, उशिरा रात्रभर चालणारी विनापरवाना हॉटेल, हुक्काबार आणि तिथे होणारी अवैध दारू, नशेच्या पदार्थांची विक्री, व्यापाऱ्यांना मारहाण आदी घटनांकडे पोलिसांनी डोळेझाक केली आहे का असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

गेल्या दोन महिन्यांत अवैध धंद्यातील स्पर्धेतून खून, सशस्त्र दरोडे आणि हत्या, रस्ते लूटमार, गावठी कट्ट्यांचा सुळसुळाट, वाळू डेपो असतानाही महसुलमंत्र्यांच्या नाकावर टिच्चून अवैध वाळू तस्करी, बनावट दारू तस्करी आणि विक्री, जुगार, मटका, बिंगो आदी अवैध व्यवसायाची भरभराट, अवैध हुक्का बार आणि तेथील अवैध व्यवसाय अशी खूप मोठी यादीच आहे.

या परिस्थितीला जितके पोलीस जबाबदार आहेत तितकेच राजकीय पक्षातील काही नेते जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. घटना घडल्यानंतर कधी हे तर कधी ते असे सोईस्कर पणे भूमिका घेत तर कधी गूपचुळी तर कधी आक्रमक होणारे राजकीय नेते शहराच्या बिघडत चाललेल्या सामाजिक स्वास्थ्याला जबाबदार आहेत की नाही, असा प्रश्न नगरकर विचारीत आहेत.

तीन दिवसांपूर्वी वाढदिवसाच्या पार्टी निमित्ताने एकत्र आलेल्या मित्रांवर रात्री अचानकपणे शहरातील काही गुंडांनी तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ओंकार उर्फ गामा भागानगरे (वय 24) याचा जागेवर मृत्यू झाला, या हल्ल्या मागची अनेक कारणे आता हळूहळू पुढे येत असून गुन्हेगार हे अवैधपणे गुटखा व्यवसायातील मोठे व्यवसायिक असल्याचे पुढे येत आहे.

काही दिवसांपूर्वी बाजारपेठेमध्ये व्यापारी आणि हातगाडी वाले यांच्यामध्येही वाद झाला होता. शहरांमधील एकंदरीत वातावरण पाहता शहरातील तोफखाना, कोतवाली या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विविध प्रकारचे गुन्हे घडत असून अनेक अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या घटना दिसून येत आहे. मात्र एकंदरीत पोलिसांचा यावर किती अंकुश आहे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.

अकोले येथे एका युवकाची कथित लवजिहाद प्रकरणावरून हत्या झाल्याचे बोलले जाते. पारनेर तालुक्यामध्येही कालच वैयक्तिक जमिनीच्या वादातून हत्या झाली. त्यानंतर पाथर्डी मध्ये एका विहिरीमध्ये एक महिला आणि तिच्या तीन मुलांचे मृतदेह आढळले. यामध्ये पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज (23 जून) पहाटे शेवगाव मध्ये दरोडेखोरांनी टाकलेल्या दरोड्यात दोन जणांचा जागेवर मृत्यू झाला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT