Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : मोदींच्या अजेंड्यावरुनच गोरेंकडून टीका : रामराजे

Umesh Bambare-Patil

सातारा : रामराजेंना बैल म्हणा, घोडा म्हणा, असा अजेंडा नरेंद्र मोदी यांनीच आमदार जयकुमार गोरेंना दिला असेल. त्यामुळे ते बोलत असतील, असा उपरोधिक टोला विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांनी लगावला.

दरम्यान, शिंदे, फडणवीस सरकारची ध्येयधोरणे व सुडाचे राजकारण पाहता या सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस यापुढे आक्रमकपणे भूमिका मांडत आवाज उठवत राहील, अशी माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस भवनातील बैठकीनंतर आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, प्रभाकर देशमुख, सत्यजित पाटणकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने आदी उपस्थित होते.

भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे हे जिल्हा दौऱ्यातील सभेत आपल्याला लक्ष्य करत आहेत. मध्यंतरी आपण व्हॉटसॲपवर स्टेटसही ठेवले होते, त्याची राज्यभर चर्चा झाली. याबाबत रामराजेंना विचारले असता ते म्हणाले, ‘‘व्हॉटसॲप स्टेटस हे २४ तासाच असतं. ते त्यांना किती झोंबलं की नाही, मला माहित नाही. ते राष्ट्रीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत.

त्यांनी काय बोलाव, हे तुम्ही, मी कोण ठरवणार?. त्यांना जर नरेंद्र मोदींनी अजेंठा दिला असेल, रामराजेंना बैल म्हणा, घोडा म्हणा, असे सांगितले असेल तर ते बोलतात. त्यांना केंद्रीय कार्यालयातून बोलण्यासाठी आदेश आला असेल तर ते बोलत असावेत.’’ जयकुमार गोरे यांनी फलटणच्या सभेत भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या रामराजेंवर लवकरच कारवाई होईल, असे सांगितले होते. याविषयी रामराजेंनी ‘ज्यावेळी होईल, त्यावेळी पाहूया’, असे म्हणता या प्रश्नाला बगल दिली.

शशिकांत शिंदे म्हणाले, ‘‘शिंदे, फडणवीस सरकारच्या विरोधात पक्षात बसल्यानंतर आक्रमकतेने सरकारविरोधात आवाज उठवण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. लवकरच आम्ही जिल्हाभर बैठका घेणार आहोत. पक्ष संघटना मजबूत करण्यावरही भर राहणार आहे. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आक्रमक राहिल.

त्यानुसार प्रत्येक तालुक्यात कार्यकर्त्यांच्या बैठका, मेळावा घेण्यात येतील. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीला आम्ही सक्षमपणे सामोरे जाऊ.’’ कोरेगाव तालुक्यातील सोळशीच्या कार्यक्रमानंतर अचानकपणे बैठक का घेतली. या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘ही बैठक पूर्वनियोजित होती. याच पध्दतीची बैठक यापूर्वी मुंबई येथे विधानभवनात झाली होती. त्यावेळी हे दौरे निश्चित केले होते.

परंतू, मध्यंतरीच्या सत्तांतरनंतर हे दौरे पुढे गेले होते.’’ अजित पवारांच्या कानपिचक्यानंतर लगेच राष्ट्रवादी भवनात बैठक होत आहे. हा केवळ योगायोग आहे, असे आमदार बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणूकीत पक्षाचे निकाल पाहिल्यानंतर लक्षात येईल की, येथील जनता कोणच्या पाठीशी आहे. जिल्हा संघटन वाढवण्यासाठी बैठक घेणे याच्यापेक्षा आजच्या बैठकीत दुसरं काहीही नव्हतं, असे मकरंद पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT