devendra fadnavis
devendra fadnavis sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आजच्या देवेंद्र फडणवीसला ओबीसी बांधवांनीचं बनवलं आहे : उपमुख्यमंत्र्यांचे दिल्लीत विधान

अतुल मेहेरे

नवी दिल्ली : मी नागपुरच्या भूमीतील आहे. गेल्या ३० वर्षांपासून राजकारणात आहे. नागपुरातून नेहमी निवडून येतो आणि ज्या परिसरातून मी सातत्याने निवडून येत आहे तिथे बहुसंख्य बांधव ओबीसी आहेत. त्यामुळे मला आजचा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हा ओबीसी जनतेनेच बनविले आहे, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे महाअधिवेशन (OBC Session) येथील तालकटोरा इनडोअर स्टेडिअममध्ये सुरू आहे. या अधिवेशनाला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके हे देखील होते.

ओबीसी बांधवांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, डॉ. बबनराव तायवाडे यांचे कौतुक केले पाहिजे. कारण त्यांनी ओबीसींना एकत्र जोडले आणि मजबुत आवाज तयार केला. आज या सभागृहात देशाच्या सर्व राज्यांतून लोक उपस्थित आहेत. ज्या २२ मागण्या केल्या आहेत, जितकी माझी क्षमता आहे, तितके त्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवणार. मी मुख्यमंत्री असताना संधी भेटली, तेव्हा स्वतंत्र ओबीसी मंत्रालय सुरू केले. २०१४ ते २०२२ या काळात ओबीसी हितांचे २२ निर्णय घेतले गेले. त्यातील २१ निर्णय मी स्वतः घेतले आहेत. शिक्षण, नोकरी, वसतिगृह, विदेश शिष्यवृत्ती, आयएएस ट्रेनिंग असेल त्या सर्व मागण्या मंजूर केल्या आणि शासन निर्णय घेतले, असेही फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वातील सरकार ओबीसींचे हक्काचे रक्षण करेल. जेव्हा ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय निघाला होता, मी सत्तेत आलो तर आरक्षण देईल, नाही तर राजकीय संन्यास घेईल, असे नागपुरात मी बोललो होतो. त्याप्रमाणे सत्तेत येताच शब्द खरा केला. आताही खुप काम करणे गरजेचे आहे आणि आम्ही ते करू. पंतप्रधान पदाला जात नसते. पण नरेंद्र मोदी (Narendra Modi) स्वतः ओबीसी आहेत आणि त्यांना ओबीसी बांधवांच्या समस्यांची माहिती आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात ४० टक्के मंत्री ओबीसी आहे. संविधानिक दर्जा ओबीसींना देण्याची बाब होती, ती मोदींनी केली. ही मागणी आम्ही रेटून धरली आणि मोदींनी ती पूर्ण केली, असे फडणवीस म्हणाले.

राजकीय पक्ष वेगळे असले तरी या मंचावर आम्ही सर्व ओबीसी हितासाठी एकत्र आलो आहोत. आज देशभर डॉ. बबनराव तायवाडेंच्या नेतृत्वात जे काम सुरू आहे, त्यामध्ये आम्ही कार्यकर्ते म्हणून काम करीत आहोत. त्यांच्या प्रत्येक निर्णयाच्या सोबत आम्ही आपल्या क्षमतेनुसार उभे राहू, असेही आश्वासन फडणवीस यांनी दिले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार अभिजित वंजारी, माजी मंत्री महादेव जानकर, खासदार बाळू धानोरकर, अॅड. फिरदोस मिर्झा, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव डॉ. अशोक जिवतोडे, सचिन राजुरकर, महतो, मन्साकी, हनुमंतराव, जाजुला गौड, राव यांच्यासह महासंघाचे देशभरातील पदाधिकारी होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT