Ajit Pawar
Ajit Pawar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar On AhilyaDevi Nagar: नगरचे ‘अहिल्यादेवी नगर’ करण्याचे स्वागतच; पण दिल्लीतील महाराष्ट्रात सदनातून....’

सरकारनामा ब्यूरो

Pune : नगर जिल्ह्याचे अहिल्यादेवी नगर असे नामांतर करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे, त्याचे आम्ही स्वागतच करतो. पण, महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावकर यांची जयंती साजरी करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटविण्याचे काहीच कारण नव्हते, असे खडेबोल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला सुनावले. (Decision to rename Ahmednar district Ahilya Devi Nagar is welcome : Ajit Pawar)

नगर (Nagar) जिल्ह्याच्या नामांतराच्या राज्य सरकारच्या निर्णयावर अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते. ते म्हणाले की, अहिल्यानगर, अहिल्यादेवी नगर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अशी तिघांची वेगवेगळी स्टेटमेंट आहेत. सरकारी निर्णयाचे परिपत्रक निघेल, त्यानंतरच नेमकं काय नाव आहे, हे समजेल. नगरचे नामांतर करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. त्याबाबत राज्य सरकारने ३१ मे रोजी चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी ही घोषणा केली.

राज्याचे प्रमुख जयंतीदिनी चौंडी येथे जाऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जनतेच्या वतीने अभिवादन करतात. पण, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरच्या नावामांतराबाबत न्यायालयाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने काय निर्णय घ्यावा, त्या सरकारचा अधिकार असतो, असेही पवार यांनी नमूद केले.

अजितदादा म्हणाले की, धनगर समाजाला आकृष्ट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे का, या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी या सरकारकडून एक चूक झाली होती. त्या ठिकाणी असलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई यांचे पुतळे हटविण्यात आले होते.

सावकरांची जयंती साजरी करत असताना अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटविण्याचे काहीच कारण नव्हते. त्यानंतर राज्यात निषेध आणि आंदोलने झाली. वेगवेळ्या मागण्या त्या ठिकाणी झाल्या. हे सरकार असल्यापासून महापुरुषांद्दल बेताल वक्तव्ये कशी केली जात आहेत. त्यांचे वाचाळवीर कसे बोलतात, मोठमोठे नेतेही वेगवेळी स्टेटमेंट करतात. त्यात ही दिल्लीतील घटनेची भर पडली. तसेच, बारामतीत येऊन धनगर आरक्षणचा मुद्दा पहिल्या कॅबिनेटमध्ये सोडविण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. आरक्षणावरून धनगर समाजाचे लक्ष विचलित करण्याचे काम केले जात आहे का, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

नगर जिल्ह्याच्या नामांतराची वेळ आताच का निवडली आहे. महापुरुषांची नावे महत्वाच्या ठिकाणी दिली पाहिजे. पण, त्यामागे राजकारण करण्याचे काम करू नये. कुठल्यातरी निवडणुका, स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेण्यात येऊ नये, एवढीच माझी अपेक्षा आहे, असेही पवार यांनी म्हटले आहे.

तारखेनुसार शिवराज्यभिषेक दिन ६ जून रोजी

तिथीनुसार आज शिवराज्यभिषेक दिन सोहळा आहे. तारखेनुसार ६ जून रोजी राज्य सरकारने शिवराज्यभिषेक दिन सोहळा आयोजित केलेला आहे. त्यामुळे काहीजण तारखेनुसार, तर काहीजण तिथीप्रमाणे साजरा करत आहेत, असेही शिवराज्यभिषेक दिनानिमित्त अजित पवार यांनी सांगितले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT