Satej Patil, Dhananjay Mahadik, Shahu Chhatrapati Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vishalgad Encroachment : भाजप खासदार महाडिकांचा विशाळगड हिंसाचारावरुन शाहू महाराज, सतेज पाटलांवर निशाणा; म्हणाले...

Rahul Gadkar

Kolhapur News, 17 July : विशाळगड येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणात गजापूर पैकी मुसलमान वाडी येथे कोल्हापुरचे खासदार शाहू महाराज, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी भेट देऊन राज्य सरकारवर निशाणा साधला होता.

याच पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. 17 जुलै) रोजी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषद घेत इंडिया आघाडीच्या या भेटीवर सडकून टीका केली. शिवाय माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर आरोप करत त्यांच्याच वक्तव्याची चौकशीची मागणीही महाडिकांनी यावेळी केली.

माजी पालकमंत्री हे अतिक्रमण केलेल्या लोकांना मदत करायला गेले हे ढोंग आहे. हे पुतना मावशीचे प्रेम आहे. गेल्यावेळी माजी पालकमंत्री यांनी दंगल होणार दंगल होणार असं म्हटलं होतं. यावेळी पण तेच झालं. त्यांच्या या सगळ्या वक्तव्यांची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी धनंजय महाडिक (Dhananjaya Mahadik) यांनी केली. ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

खासदार शाहू महाराज यांनी शिवभक्तांना अतिरेकी म्हणून संबोधलं, हे अतिशय दुर्दैवी आहे. इंडिया आघाडीचा हा अजेंडा आहे का? महाविकास आघाडी कुणासोबत आहे हे त्यांनी जाहीर करावं. महाविकास आघाडी शिवाजी महाराज यांच्यासोबत आहेत की अतिक्रमण केलेल्या नागरिकांसोबत हे जाहीर करावं? असा सवाल महाडिक यांनी उपस्थित केला.

एकाच घरात दोन भूमिका कशा?

दरम्यान, यावेळी महाडिक यांनी शाहू महाराजांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, "माजी पालकमंत्र्यांनी या घटनेचं सगळं खापर प्रशासनावर फोडलं. मात्र, हे अतिक्रमण आताचे नाही तर 15 ते 20 वर्षांपूर्वीचं आहे. प्रशासनाने संभाजीराजेंना (Sambhajiraje) का थांबवलं नाही म्हणता? मी त्यांना विचारतो तुम्ही का त्यांना थांबवलं नाही? एकाच घरात दोन भूमिका कशा असू शकतात? एकाने म्हणायचं पाडा आणि दुसऱ्यांनी म्हणायचं पाडू नका. अशा शब्दात महाडिकांनी समाचार घेत शाहू महाराज कान धरून उभं राहीले हे पाहून खूप वाईट वाटलं. कारण शाहू महाराज हे आमचे श्रद्धास्थान आहेत, असंही महाडिक म्हणाले.

काही महिन्यांपूर्वी दसरा चौकात निष्पाप शालेय मुलांच्या बसवर दगडफेक झाली. त्यावेळी तुमचे अश्रू कुठे गेले होते. हे केवळ मतांचे राजकारण सुरू झालं असून अतिक्रमण काढण्यासाठी शिवभक्तांना आंदोलन करावं लागतं हे दुर्दैवी आहे. राज्यातील सर्व गडावर असलेली अतिक्रमणे काढली पाहिजेत. यासाठी आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहोत.

या झालेल्या प्रकारचा खरा सूत्रधार कोण हे शोधलं पाहिजे. कारण पहिल्या दिवशी 21 पकडले गेले त्यामध्ये कसबा बावड्यातील अनेकजण आहेत, त्यामुळे हे सगळं संशयास्पद असून ते सहज गेले आणि हे घडवलं असं नाही तर हा प्री प्लॅन आहे, असा संशय देखील महाडिक यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT