Dhawalsingh Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mangalwedha Water Problem : 'म्हैसाळ'चं पाणी पेटणार? धवलसिंह मोहितेंचा अधिकाऱ्यांना इशारा; म्हणाले...

हुकूम मुलाणी

Solapur Political News : संपूर्ण महाराष्ट्राला यंदा दुष्काळाच्या झळा बसत आहेत. त्यामुळे पाण्यासह विजेचीही मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. अवर्षणग्रस्त म्हणून ओळखला जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. ती वाचावीत म्हणून पुरेशा पाण्यासाठी शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींनीही जोर लावल्याचे दिसून येत आहे. मंगळवेढ्याच्या कायम दुष्काळी भागाला म्हैसाळ योजनेचे पाणी मिळण्यासाठी काँग्रेस आक्रमक झाल्याची दिसून येत आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी अधिकाऱ्यांना थेट घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. (Latest Political News)

मंगळवेढा (Mangalwedha) येथील प्रांत कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना व पाणी संघर्ष समितीच्या वतीने बेमुदत आंदोलनात सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनास मोहिते पाटलांनी भेट देऊन त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. 'मंगळवेढ्याच्या दुष्काळी भागाला म्हैसाळ योजनेचे पाणी टेल टू हेड या शासन नियमाप्रमाणे वेळेत सोडावे, अन्यथा अधिकाऱ्यांना घेराव घालू' असा इशारा योजनेच्या अधिकाऱ्यांना धवलसिंह मोहिते पाटलांनी मोबाईलवर बोलताना दिला आहे. यामुळे मंगळवेढ्यासह परिसरातील दुष्काळी भागातील पाणी संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले, "सर्वसामान्य शेतकरी, मजूर कामगार यांच्या प्रश्नाकडे सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे हे सरकार बदलले पाहिजे. सर्व घटकांना बरोबर घेऊन या देशात परिवर्तन करणे गरजेचे आहे. पुरोगामी सोलापूर जिल्हा पुन्हा प्रगतीपथावर घेण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. दरम्यान, मंगळवेढ्याच्या दुष्काळी भागाला वेळेत पाणी मिळाले नाही तर म्हैसाळ पाणी योजनेच्या अधिकाऱ्यांना घेराव घालणार आहे."

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडीचे अध्यक्ष अॅड. राहुल घुले यांनीही सरकारव सडकून टीका केली. ते म्हणाले, "स्व.नागनाथ अण्णा नायकवडी, गणपतराव देशमुख, भारत भालके आणि शिवाजीराव काळुंगे यांनी उभारलेल्या पाणी चळवळीच्या माध्यमातून म्हैसाळचे पाणी मतदारसंघात आले. परंतु हेच आमच्या हक्काचे पाणी राज्यकर्त्यांमुळे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. आमच्या घशात जाणारे पाणी कोण अडवते?," असा प्रश्नही घुलेंनी उपस्थित केला.

"अधिकारी व विमा कंपनी यांच्यात संगनमत असल्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई देण्यास टाळाटाळ केली जाते. तर ठराविक महसूलला भरपाई देऊन इतर मंडल वगळण्याचे प्रकार करून शेतकऱ्यांना नाडण्याचे काम अधिकारी करतात. त्या अधिकाऱ्यांना सरकार पाठिशी घालत आहे", असा आरोपही घुलेंनी केला.

यावेळी युवराज घुले, आबा खांडेकर,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, राजाभाऊ चेळेकर, मारुती वाकडे, पांडुरंग जावळे, अॅड. अर्जुन पाटील, रविकिरण कोळेकर, मनोज माळी, इसाक शेख, अशोक चेळेकर, सिध्देश्‍वर हेंबाडे, आदीसह काँग्रेसचे व स्वाभिमानीचे आंदोलक यावेळी उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT