Milind Shambharkar
Milind Shambharkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

जिल्हाधिकाऱ्यांनी झुगारला राष्ट्रवादीचा दबाव : सरपंचांसह ५ जणांवर अपात्रतेची कारवाई

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (जि. सोलापूर) : मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावचे विद्यमान सरपंच सचिन घुले यांच्यासह पाच सदस्यांना निवडणूक खर्च विहीत नमुन्यात सादर न केल्याने सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अपात्र केले. ही कारवाई रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) एका बड्या पदाधिकाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांवर दबाब टाकल्याची चर्चा आहे. मात्र, जिल्हाधिकारी शंभरकर (Milind Shambharkar) यांनी तो दबाव झुगारून देत ही कारवाई केली आहे. (Disqualification action taken by Collector against five members including Sarpanch of Marwade)

दरम्यान, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी शंभरकर यांचा हा आदेश या गटात महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

मरवडे ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यामध्ये मंगळवेढा तालुक्याच्या राजकीय पटलावरील माजी आमदार प्रशांत परिचारक, धनश्री परिवाराचा काळुंगे गट, बामसेफ, शेतकरी संघटना तसेच पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसीचे अध्यक्ष लतिफ तांबोळी यांच्या गटाने एकत्र येत गावविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता मिळवली होती. सत्ताधारी गटाचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह अन्य तीन ग्रामपंचायत सदस्यांनी या निवडणुकीतील खर्च विहीत नमुन्यात सादर केला नसल्याची तक्रारी विरोधी गटाचे बालाजी पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली होती.

राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या संहितेप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल करताना उघडण्यात आलेल्या बँक खात्यावरून निवडणूक खर्च करणे बंधनकारक असताना या नियमांचे उल्लंघन झाले आहे. सरपंचांसह पाच सदस्यांनी रोखीने खर्च केल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले होते. सत्ताधारी गटाच्या पाच सदस्यांविरोधातील सुनावणी ७ डिसेंबर २०२१ रोजी पूर्ण झाली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सरपंच सचिन घुले, मीनाक्षी सूर्यवंशी, अंजना चौधरी, सुमन गणपाटील, दिक्षा शिवशरण या सदस्यांना आदेशाच्या तारेखपासून पदावर राहण्यास अपात्र घोषित करण्यात आले. या पाच जणांवर पुढील पाच वर्षे कोणतीही निवडणूक लढविण्यावर निर्बंध घातले आहेत.

सरपंचांसह पाच ग्रामपंचायत सदस्यांवरील अपात्रतेची कारवाई रोखण्यासाठी राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने दबाव टाकल्याची चर्चा आहे. तसेच, यातून काय पळवाट काढता येईल, याची चाचपणी केली होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी ठाम राहत ही कारवाई केली आहे.

मागील पंचवार्षिक कालावधीत स्वाभिमानी परिवाराचे संजय पवार यांनी मोठ्या प्रमाणात विकासनिधी खेचून आणून गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना देत जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळवून देऊन गावचा लौकिक उंचावला होता. त्यांची राजकीय घौडदौड रोखण्यासाठी गाव विकास आघाडी स्थापन करण्यात आली होती. ही गाव विकास आघाडी मंगळवेढा तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा ठरली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT