Dr. Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dr. Sujay Vikhe Patil : मंदिरे कोटींची अन् ज्ञानमंदिरे...

सरकारनामा ब्युरो

अशोक निंबाळकर

Dr. Sujay Vikhe Patil : मी सर्वत्र बिनधास्त बोलतो. परंतु शिक्षकांपुढे बोलण्याची हिंमत नाही. माझे आजोबा शिक्षकांविषयी नेहमी आदर बाळगायला सांगायचे. त्यांची शिकवण मी आजही पाळतो. शिक्षक हसला तर यशस्वी झालो, नाही तर काही बोललो तर ती राजकीय आत्महत्या ठरेल. मी तुमच्याविषयी वावगं काही बोलणार नाही. सर्व अडचणीत मी तुमच्यासोबत आहे, फक्त बदल्या सोडून, अशी कोपरखळीही खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी मारली.

जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण महसूलमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी खासदार डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, राजेश परजणे, राजेंद्र गुंड, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, माजी नगरसेवक धनंजय जाधव, निखिल वारे आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, आमदार-खासदाराला वाटले पाहिजे की आपला मुलगा या झेडपी शाळेत शिकला पाहिजे, तरच या शाळांचा उद्देश सफल होईल. गावात अडीच कोटींचे मंदिर बांधल्याचे कार्यकर्ते सांगतात. परंतु कोट्यवधींची ज्ञानमंदिरे बांधल्याचे कोणी सांगत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. मंदिरेही बांधा, लाखोंचे हरिनाम सप्ताह ही करा. पण शाळांकडे दुर्लक्ष करू नका. शाळेसाठी कोणी भांडत नाही. ज्याला-त्याला बंधारा आणि मुरमीकरणाचे काम पाहिजे. हे मुरमीकरण तर निव्वळ कार्यकर्ते जगवायचे काम आहे, अशा शब्दांत कानउघाडणी करीत डॉ. विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांची शाळा घेतली.

राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, कोविडपूर्वी ऑनलाईन शिक्षण प्रचलित नव्हते. परंतु आता त्यामुळे शिक्षण क्षेत्रात अनेक नवीन बदल झाले, ते सर्वांनी स्वीकारले पाहिजे. पारंपरिक शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड हवी. शाळांच्या डिजिटायझेशनसाठी सीएसआर फंड वापरावा. उद्योगपती आनंद महिंद्रांकडे तशी मागणी केलीय. विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा मिळाल्यासच शिक्षणाचा दर्जा टिकण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, दर्जेदार शिक्षणासाठी नवीन शिक्षण धोरण आणलेय. प्राथमिक शिक्षक हाच पाया असल्याने ते प्रभावीपणे राबवू शकतात. मुलांच्या सहली काढल्या पाहिजे. त्यांना नेवासे पुणे, राहुरी विद्यापीठ दाखवले पाहिजे. यासाठी डीपीसीमधून वेगळी तरतूद केली जाईल. मतदारसंघातील सर्व शाळा डिजिटल करणार आहे.

जिल्हाधिकारी भोसले म्हणाले, निवडणूक काम आणि पोषण आहार हे शिक्षकांना शालाबाह्य काम वाटते. परंतु सरकारकडे दुसरी कोणतीही यंत्रणा नाही. हे लोकशाहीचेच काम आहे. दुसरीकडे मुख्यालयी राहण्याविषयी त्यांची तक्रार असते. तुम्ही तेथे नाही राहिलात, तर विद्यार्थी आणि शिक्षकाचे नाते कसे तयार होईल.

सीईओ येरेकर म्हणाले, नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षांत जिल्हा परिषद शाळांतील मुलांचा टक्का वाढला आहे. पटसंख्याही नऊ हजारांनी वाढली, ही आनंदाची बाब आहे. बहुतांशी ठिकाणी इमारती नाहीत, त्या जिल्हा नियोजनमधून मिळाल्यास विद्यार्थ्यांची सोय होईल. पुरस्कारार्थींच्या वतीने तरन्नूम शेख (बेलापूर), विजय राऊत (कर्जत) यांनी मनोगत व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT