Electricity Arrears
Electricity Arrears Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्र अंधारात बुडणार : महापूर येऊनही पिण्याचे पाणी न मिळण्याची शक्यता

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : पथदिवे व सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या वीजबिलांची पश्चिम महाराष्ट्रातील थकबाकी ही एक हजार ६१७ कोटी ३१ लाख रुपयांवर गेली आहे. त्यात सर्वाधिक थकबाकी ग्रामपंचायतींची आहे, ग्रामपंचायतींनी चालू वीजबिल भरले नाही, तर त्यांचे पथदिवे व पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र अंधारात बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, महापूर आलेल्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत पाणी योजनांचे वीजजोड तोडण्यात येणार असल्याने तेथे नळावाटे येणारे पिण्याचे पाणी मिळणार नाही. (Electricity arrears in Western Maharashtra at Rs 1,617 crore)

ग्रामपंचायत हद्दीतील पथदिवे व पाणीपुरवठा योजनांच्या चालू वीजबिलांचा भरणा करण्याची जबाबदारी ग्रामसेवक व सरपंचांवर देण्यात आली आहे. त्यात दिरंगाई झाल्यास त्यांना वैयक्तिक जबाबदार धरण्यात येणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींसह स्थानिक स्वराज्य संस्थांना पथदिवे व पाणीपुरवठा योजनांसाठी ३२ कोटी ६० लाख रुपयांचे चालू वीजबिल देण्यात आले आहेत. मात्र, ग्रामपंचायतींकडून चालू वीजबिलांचा देखील भरणा होत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे हे बील न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई होणार आहे.

राज्यातील पथदिवे व पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीजबिलांबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारकडून समिती गठीत करण्यात आली आहे. थकबाकीचा निर्णय होईपर्यंत ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून पथदिवे व पाणीपुरवठा योजनांच्या चालू वीजबिलांची रक्कम दिलेल्या मुदतीत महावितरणकडे जमा करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार ही चालू वीजबिले न भरल्यास पथदिवे व पाणीपुरवठा योजनांची वीज कापली जाणार असल्याचा इशारा महावितरणने गुरुवारी दिला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने ग्रामपंचायतींनी पथदिवे व सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांच्या वीजबिले थकविल्याने महावितरणवरील थकबाकीचे ओझे वाढले आहे. पुणे जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे १०९ कोटी ८० लाख तर पथदिव्यांचे ४५२ कोटी ३२ लाख रुपये थकलेले आहेत. हाच आकडा सोलापूर जिल्ह्यात अनुक्रमे ७५ कोटी ४४ लाख आणि  ४६९ कोटी रुपये थकीत आहे. सातारा जिल्ह्यात तो १७ कोटी ५९ लाख आणि १९८ कोटी १३ लाख रुपये आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे ८८ कोटी ५३ लाख आणि पथदिव्यांची ७१ कोटी २४ लाख रुपयांची थकबाकी आहे. सांगली जिल्ह्यात पाणी योजनेचे २६ कोटी ६९ लाख आणि स्ट्रीट लाईटचे १०७ कोटी ६३ लाख थकीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT