Ajit Pawar-Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Western Maharashtra : पालकमंत्री वाटपात भाजपची धूर्त खेळी; बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातून राष्ट्रवादी हद्दपार, मित्रपक्षांवर भिस्त!

Guardian Minister List : पुण्याचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीकडे, तर कोल्हापूर आणि साताऱ्याची जबाबदारी ही शिवसेनेकडे देण्यात आलेली आहे. हे दोन जिल्हे देताना कोल्हापुरात सहपालकमंत्री करून भाजपने आपल्या हातात वेसन ठेवली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 19 January : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल पावणे दोन महिन्यांनंतर महायुती सरकारने पालकमंत्री जाहीर केले आहेत. यात सर्वाधिक मोठा वाटा हा अर्थातच भाजपकडे आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला नऊ, तर राष्ट्रवादीच्या वाट्याला सात पालकमंत्रिपदे आली आहेत. पालकमंत्रिपदाच्या माध्यमातून भाजपने मोठी खेळी केल्याचे दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, या बालेकिल्ल्यातून पालकमंत्रिपदाबाबत राष्ट्रवादी हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे. पुणे वगळता शिवसेना-भाजपच्या ताब्यात चार जिल्ह्यांचे पालकत्व गेले आहे, त्यामुळे पक्षवाढीला खोका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra) हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला मानला जातो. अर्थात फुटीनंतर राष्ट्रवादीची ताकद विभागली गेली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित असताना पक्षाचे सर्वाधिक आमदार याच भागातून निवडून यायचे. आताही अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने ११ जागा पश्चिम महाराष्ट्रात जिंकलेल्या आहेत, तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे वगळता एकाही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेले नाही. एकेकाळी पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश पालकमंत्रिपदे ही राष्ट्रवादीकडे असायची.

महायुतीच्या पालकमंत्रिपदाच्या (guardian minister ) वाटपातून राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रातून बरोबर बाहेर काढले आहे. त्याचा तोटा पक्षाला बालेकिल्ल्यात बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालकमंत्र्यांच्या अधिपत्याखाली जिल्हा नियोजन समिती काम पाहत असते. या नियोजन समितीच्या माध्यमातून विकास कामांना निधी दिला जातो. त्यात पालकमंत्री आपल्या कार्यकर्त्यांना झुकते माप देतात, हे उघड सत्य आहे.

जिल्हा नियोजन समितीवर कोणाला संधी द्यायची आणि कोणत्या तालुक्यातील कार्यकर्त्याला निधीच्या माध्यमातून बळ द्यायचे हेही पालकमंत्रीच ठरवत असतात, त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी पालकमंत्रिपद हे ‘टॉनिक’ ठरते. मात्र, राष्ट्रवादीला (NCP) भाजपने बालेकिल्ला मानला जात असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातून अलगदपणे बाहेर काढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पक्षवाढीसाठी राष्ट्रवादीला आता मित्रपक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

पुण्याचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीकडे, तर कोल्हापूर आणि साताऱ्याची जबाबदारी ही शिवसेनेकडे देण्यात आलेली आहे. हे दोन जिल्हे देताना कोल्हापुरात सहपालकमंत्री करून भाजपने आपल्या हातात वेसन ठेवली आहे. साताऱ्यात तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आमदार आहेत, तरीही पालकमंत्रिपद हे शिवसेनेकडे देण्यात आलेले आहे. भाजपकडे सांगली, सोलापूरचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला पद्धशीरपणे पश्चिम महाराष्ट्राच्या बाहेर काढण्यात फडणवीस यशस्वी ठरले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात कोणत्या पक्षाकडे कोणते जिल्हे आहेत?

पुणे : अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)

सांगली : चंद्रकांत पाटील (भाजप)

सातारा : शंभूराज देसाई (शिवसेना)

सोलापूर : जयकुमार गोरे (भाजप)

कोल्हापूर : प्रकाश आबिटकर (शिवसेना) तर सहपालकमंत्री माधुरी मिसाळ (भाजप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT