Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Soapur News : 'समृद्धी'चा कार्यक्रम संपवला अन्‌ जेवणही न करता तुमच्या दर्शनासाठी सोलापुरात आलो

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मी समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम संपवला आणि जेवणदेखील न करता तसंच धावपळ करत विमानात येऊन बसलो. नागपूरहून थेट आपल्या सर्वांच्या दर्शनासाठी आम्ही सोलापुरात आलो, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. (Gurav Samaj Grand Convention News update)

गुरव समाजाच्या महाअधिवेशनाचे आयोजन आज (ता. ११ डिसेंबर) सोलापुरात करण्यात आले होते. त्यात बोलताना फडणवीस यांनी अकरा तारखेला एकाच वेळी आलेल्या कार्यक्रमाबाबत सांगितले.

फडणवीस म्हणाले की, समृद्धी महामार्गाचं आज लोकार्पण होतं. विजयराज शिंदे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी गुरव समाजाच्या अधिवेशनाच्या कार्यक्रमासाठी ११ डिसेंबर ही तारीख दिली होती. पण, आम्हाला अचानकपणे दिल्लीहून निरोप आला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ तारखेचा समृद्धी महामार्गाच्या उदघाटनाचा कार्यक्रम स्वीकारला आहे.

विजयराज शिंदे यांना आम्ही बोलावलं आणि ‘अकरा डिसेंबर रोजी तुम्हीही सकाळी अकराची वेळ दिली आहे. तसेच, पंतप्रधान मोदी यांनीही अकराचीच वेळ दिली आहे. कसं करता येईल,’ अशी आम्ही त्यांना विचारणा केली. त्यावर शिंदे म्हणाले की, आमचे लोक असे आहेत की, तुम्ही ११ वाजता बोलावलं आणि तुम्ही चार वाजता आला तर लोक वाट पाहतील. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, असा मध्यम मार्ग त्यांनी काढला, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी समृद्धी महामार्गाच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम संपवला. आम्ही जेवणदेखील केलं नाही. तसंच धावपळ करत विमानात येऊन बसलो आणि आपल्या सर्वांचं दर्शन घेण्यासाठी सोलापुरात पोचलो.

महर्षी दधिची यांचा इतिहास सांगणारा आणि त्यांच्याशी नातं सांगणारा हा गुरव समाज आहे. वारकारी संप्रदायात वेगळं स्थान निर्माण करणारे संत काशिबा यांच्याशी नांत सांगणारा हा गुरव समाज आहे. देव, देश आणि धर्मासाठी या समाजाने सर्वस्व अर्पण केले आहे. त्यामुळेच गाव तिथं मंदिर आणि मंदिर तिथं गुरव समाज आज आपल्याला पहायला मिळतो. हा गुरव समाज अल्पसंख्याक असला तरी गावातील ही गुरव समाजाची घरं ही दुधातील साखरेसारखी असतात. मंदिरात दिवाबत्ती, पूजाअर्चा, प्रसंगी समाज प्रबोधनाची कामही या समाजाकडून केली जातात, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

शतकानुशतके हा समाज ईश्वराची सेवा करणारा हा समाज आहे. त्यामुळे आता आमची जबाबदारी आहे की तुमची सेवा करण्याची संधी आता मिळाली आहे. त्यामुळे निश्चितपणे तुमची सेवा करण्याचा प्रयत्न आम्ही करु. त्यामुळे गुरव समाजाला डोळ्यासमोर ठेवूनच इनाम वर्ग तीनच्या जमिनीचा निर्णय मुख्यमंत्री करतील, असा विश्वास ही गुरव समाजाला देतो, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT