Kolhapur News, 17 Oct : डिबेंचरच्या मुद्द्यावरून 'गोकुळ'मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या महायुतीची सत्ता असली तरी काल झालेल्या आंदोलनात महायुतीतीलच घटक पक्ष परस्परांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र दिसले.
डिबेंचरचे कारण असले तरी त्याला मागील पाच वर्षातील गोकुळच्या निवडणुकीतील पराभव आणि आगामी निवडणुकीतील राजकीय समीकरणाचा संदर्भ आहे. यापूर्वी मंत्री मुश्रीफ यांनी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांना गोकुळच्या आगामी निवडणुकीचे कारण सांगत होणाऱ्या महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये.
यासाठी असे वक्तव्य टाळण्याचे आवाहन केले होते. मात्र काल गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी डिबेंचर कपातीच्या निर्णयाविरोधात काढलेल्या मोर्चामुळे सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी काल गोकुळ प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढला.
या मोर्चामध्ये कपात केलेली रक्कम ही परत मिळावी अशी मुख्य मागणी होती. मात्र ज्या पद्धतीने या मोर्चाचं स्वरूप निर्माण झाले. त्यामुळे निश्चितपणे महायुतीत असणाऱ्या इतर नेत्यांना ही गोष्ट कदाचित खटकण्याची शक्यता आहे. शेतकरी, दूध संस्थांना न्याय मिळालाच पाहिजे, यात दुमत नाही, त्यासाठी योग्य निर्णय अपेक्षित आहे.
'गोकुळ'चे अध्यक्ष नविद मुश्रीफ हे महायुतीच्या घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) असून, संघात त्यांचे नेतृत्व आहे. परंतु या नेतृत्वाविरोधातच मोर्चाचे नेतृत्व महायुतीच्याच दुसऱ्या घटक पक्ष असलेल्या भाजपच्या शौमिका महाडिक यांनी केले. डिबेंचर कपातीच्या निर्णयाविरोधात प्राथमिक दूध संस्था, उत्पादक रस्त्यावर उतरले आणि त्यांना अपेक्षित असणाऱ्या मागण्या गोकुळ संचालकांसमोर व्यक्त केल्या.
या मोर्चात ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे (राष्ट्रवादी), संचालक अजित नरके, बाळासाहेब खाडे यांच्या मतांविरोधात महाडिक यांच्यासह मोर्चात सहभागी प्रतिनिधींनीही नाराजी व्यक्त केली. त्यामुळे डिबेंचरसारखा विषय महायुतीच्या घटक पक्षांतर्गत सोडवला जाऊ शकतो, यासाठी मोर्चा काढण्याची किंवा मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांना सत्तेतील महायुतीच्या संचालकांनीच उत्तर देण्याची गरज का भासते, असा सवाल आहे.
शिवाय यापूर्वी देखील काही संस्था चालक आणि दूध उत्पादकांनी ही कपात परत करावी यासाठी गोकुळ प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र मध्यंतरीच्या दहा दिवसाच्या कालावधीत गोकुळ प्रशासनाकडून याकडे गांभीर्याने पाहिले नाही. ही देखील तितकीच वस्तुस्थिती आहे. 'गोकुळ'चे सत्ताधारी असो किंवा विरोधक यांनी शेतकरी आणि दूध संस्थांच्या हिताचा निर्णय घेतलाच पाहिजे. यात कोणाचेही दुमत नाही .
पण महायुतीत राहूनच एकमेकांविरोधाच्या कारभाराबाबत टीका केली जात असेल तर महायुतीतील हा बेबनाव ठळकपणे दिसून येत आहे. मोर्चात शौमिका महाडिक यांनी गोकुळ प्रशासनावर पारदर्शकतेचा अभाव, उत्पादकांविषयी अन्यायकारक निर्णय आणि डिबेंचर कपातीमुळे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप केला. 'शेतकऱ्यांच्या मेहनतीवर चालणाऱ्या गोकुळने त्यांच्याच हिताला तडा दिला आहे, असा आरोप त्यांनी केला.
दुसरीकडे, गोकुळच्या सत्ताधाऱ्यांनी हा निर्णय संस्थेच्या आर्थिक शाश्वततेसाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. महायुतीतल्या घटक पक्षांतील या तणावामुळे 'गोकुळ'च्या आगामी निर्णय प्रक्रियेलाही नवीन वळण लागण्याची शक्यता आहे. शिवाय आगामी निवडणुकीतील महायुतीवर देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.