Gram Panchayat Election News
Gram Panchayat Election News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gram Panchayat election : ग्रामपंचायत निवडणूक; हुतात्मा गटाच्या दोन दशकांच्या सत्तेचा अस्त

महादेव अहिर

वाळवा : राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये अनेकांना धक्के बसले. तर अनेकांनी निर्विवादपणे आपली सत्ता राखली. या पार्श्वभूमीवरच हुतात्मा गटाची दोन दशकांची सत्ता उलथवून टाकताना राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसने वाळवा आणि आसपासच्या गावांतील सत्ताही निर्विवादपणे खेचून आणली आहे. आता आमची या ठिकाणी ग्रामपंचायतीत सत्ता आहे, असे म्हणायला सुद्धा जागा राहिलेली नाही. इतकी दारुण परिस्थिती हुतात्मा गटावर ओढवली आहे.

‌वास्तविक, हुतात्मा गटाची गेल्या काही वर्षांत सुरू असलेली राजकीय वाटचाल या अधोगतीला कारणीभूत मानली जात आहे. लोकांना गृहीत धरण्याचा हा परिणाम आहे. आपण लोकांना काय देतो आणि लोकांकडून कोणत्या अपेक्षा ठेवतो. यात पडलेल्या अंतराने हुतात्मा गट गावोगावी पराभूत झाला आहे.

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी फाटक्या माणसाची मदत घेऊन हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहाची स्थापना केली. शिवाय गावोगावी स्थानिक पातळीवर सत्ता राखली. परंपरेने चालत आलेली सत्ता अबाधित राखण्यासाठी सध्याच्या नेतृत्वाने कधीच शिकस्त केली नाही. त्याउलट लढणाऱ्या कार्यकर्त्यांना अडचणी निर्माण करण्यात ‘हुतात्मा’च्या नेतृत्वाने सगळी शक्ती खर्च केली‌.

याचे उदाहरण म्हणजे गाताडवाडी आहे. गाताडवाडीत शंकर जाधव यांची सातत्याने सत्ता राहिली होती. परंतु जाधव यांचे पंख छाटून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला मोकळे रान निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. पडवळवाडी, शिरगाव, खेड याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला (Congress) सर्व जागांवर विजय मिळाला.

यामागे हुतात्मा गटाची लोकांना गृहीत धरण्याची वृत्ती अंगलट आली आहे. साखर कारखाना, बँक, बझार, दूध संघ, शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणून स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या हातात ठेवायला तशी कोणतीही अडचण नाही. इथे मात्र लोकांची ॲलर्जी असल्यासारखी परिस्थिती आहे.

कार्यकर्ता मोठा झाला नाही पाहिजे. त्याउलट त्याने दारिद्र्यात राहून गटाची सेवा केली पाहिजे, हा तुघलकी निकष हुतात्मा गटाला पराभवाच्या खाईत घेऊन गेला आहे. विरोधक म्हणतात, पाथरबाई आडाच्या आतच हुतात्मा गटाचे जग आहे. आता तेही तुटक-तुटक एखाद्या प्रभागात उरले आहे. सत्ता राखण्यासाठी संस्थांचा आधार मोठा असतो. मात्र या संस्था कोणत्या सत्तेसाठी आहेत, याचेही अवलोकन झाले पाहिजे.

वाळवा तर हुतात्मा गटाचा बालेकिल्ला होता. मात्र राष्ट्रवादीने अगदी कल्पकतेने हा बालेकिल्ला ‘हुतात्मा’कडून हिसकावून घेतला आहे. हुतात्मा गटाने वैभव नायकवडी आणि गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली.

पण जे आराखडे आवश्यक होते, तिथे दुर्लक्ष केले. त्याउलट राष्ट्रवादी काँग्रेसला दिलीप पाटील, राजेंद्र पाटील आणि नेताजी पाटील यांनी बहुमत मिळवून देण्यासाठी मोठे योगदान दिले. चार-दोन लोकांना घ्यायचे आणि चोवीस तास बैठकीत वेळ घालवण्यापेक्षा ‘हुतात्मा’च्या नेतृत्वाने आता तरी या निवडणुकीतून बोध घेऊन लोकांच्या वेदना जाणून घेण्यासाठी हालचाल केली तर बरेच फायदे मिळतील. अन्यथा ज्यासाठी सगळे करायचे त्यालाही पाय फुटायला वेळ लागणार नाही, अशी सामान्य धारणा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT