Solapur DPC Meeting  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur DPC Meeting : अवैध वाळूउपशावरून पालकमंत्री गोरे आक्रमक; ‘वाळूतस्करांवर कारवाई करा; अन्यथा जिल्ह्यात नोकरी...’

Jaykumar Gore Warning : काही विभागाच्या बाबतीत गंभीर तक्रारी आहेत. यात प्रामुख्याने क्रीडा आणि आरोग्य खाते यासंदर्भात चर्चा झाली.

Vijaykumar Dudhale

Solapur, 30 January : महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक आज झाली. त्या बैठकीत 2025-26 या आर्थिक वर्षांचा 1019 कोटी रुपयांच्या प्रारूप विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली. राज्य समितीच्या मंजुरीनंतर तो खर्च करण्यास परवानगी मिळणार आहे. दरम्यान, वाळू तस्कारांवर कारवाई करा; अन्यथा या जिल्ह्यात तुम्हाला नोकरी करण्याचा अधिकार नाही, असा इशाराही पालकमंत्री गोरे यांनी दिला.

दरम्यान, पाकणीतील जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या जमीन हस्तांतरणासाठी राज्य सरकारकडून निधी मिळवू. पण, एवढा मोठा प्रकल्प रखडू नये, यासाठी महापालिकेने नऊ कोटी रुपये देण्याची तयारी ठेवावी, अशी सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी सोलापूरला महापालिकेला केली आहे.

सोलापूर (Solapur) जिल्हा नियोजन समितीची पालकमंत्री गोरे यांच्या अधिपत्याखाली नियोजन भवनात बैठक झाली. बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, खासदार धैर्यशील मोहिते पाटील (ऑनलाईनद्वारे), खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार दिलीप सोपल, आमदार नारायण पाटील, आमदार राजू खरे, आमदार अभिजीत पाटील, आमदार उत्तम जानकर, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, आमदार देवेंद्र कोठे आणि जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हा वार्षिक योजनेतील एक हजार 19 कोटी 33 लाख रुपये आखाड्यात जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणसाठी 861.89 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनांसाठी 152 कोटी, तर आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना 5.44 कोटी अशी तरतूद करण्यात आलेली आहे. राज्य समितीने या आराखड्यास मंजुरी दिल्यानंतर तो खर्च करण्याची परवानगी जिल्हा नियोजन समितीला मिळते.

पालकमंत्री गोरे म्हणाले, काही विभागांना अतिरिक्त पैशाची गरज होती, त्या संदर्भात चर्चा झाली. मागील वर्षाच्या आरखडा अंमलबजावणी संदर्भात देखील चर्चा झाली. मागील जिल्हा विकास आराखड्यातील एकूण ७८ टक्के निधी २० जानेवारीपर्यंत खर्च झाला आहे. मार्चच्या अगोदर उर्वरित निधीही येईल, त्याच्या खर्चाची तरतूद प्रशासनाने केली आहे. काही विभागाच्या बाबतीत गंभीर तक्रारी आहेत. यात प्रामुख्याने क्रीडा आणि आरोग्य खाते यासंदर्भात चर्चा झाली.

अनाधिकृत वाळूउपश्यासंदर्भात बोटचेपी भूमिका सहन केली जाणार नाही. स्थानिक यंत्रणा सोबत असल्याशिवाय वाळू उपसा होत नसतो, त्यामुळे हा गंभीर प्रश्न आहे.अवैध वाळूउपसा आणि वाहतुकीवर कारवाई करण्यास अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली तर मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून बिलकुल सहन करणार नाही. वाळू तस्कारांवर कारवाई करा; अन्यथा या जिल्ह्यात तुम्हाला नोकरी करण्याचा अधिकार नाही, असा इशाराही जयकुमार गोरे यांनी दिला.

सोलापूरच्या समांतर जलवाहिनीबाबतही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कडक भूमिका घेतली. ते म्हणाले, उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. समांतर जलवाहिनी झाल्यास मोठ्या प्रमाणात पाणीची बचत येईल. पाकणी जलशुद्धीकरण प्रकल्पाची जमीन ही वन विभागाची आहे. प्रकल्पासाठीची जमीन हस्तांरित झाल्याशिवाय योजना पूर्णपणे कार्यान्वित होऊ शकत नाही, असं यंत्रणेने म्हटलं आहे.

पाकणी जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणसाठी लागणारे 9 कोटींची फाईल कुठे अडली आहे, हे मी स्वतः पाहून ती मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्य सरकारकडून पैसे मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील. पण एवढा मोठा प्रकल्प थांबता कामा नये, यासाठी महापालिकानेही 9 कोटी रुपये भरण्याची तयारी ठेवावी, अशी सूचनाही पालकमंत्री गोरे यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT