
Mumbai, 30 January : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. देशमुख यांचा खून, वाल्मिक कराडचे दाखल झालेला मोका यावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. आमदार सुरेश धस यांच्यासोबत राष्ट्रवादीचे काही आमदार, तसेच अंजली दमानिया आणि विरोधी पक्षांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्यातच मुंडे यांनी बुधवारी (ता. 29 जानेवारी) दिल्लीवारी केली आहे, त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, मुंडेंचा राजीनामा कोण घेणार, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट नावच सांगितले आहे.
संतोष देशमुख खून प्रकरणी वाल्मीक कराड याच्यावर मोका लावल्यानंतर मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी वाढली आहे. कराड हा मुंडे यांचा निकटवर्तीय असून मुंडे मंत्रिपदी राहिल्यास निष्पक्ष चौकशी होणार नाही, त्यासाठी मुंडेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी लावून धरलेली आहे. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेऊन काही कागदपत्रेही त्यांच्याकडे सुपूर्त केली आहेत.
भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळुंके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप क्षीरसागर यांच्याशिवाय विरोधातील महाविकास आघाडीतील पक्षांनीही धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. मात्र, अद्यापपर्यंत मुंडेंचा राजीनामा झालेला नाही. त्यातच त्यांनी बुधवारी दिल्ली दौरा केला आहे, त्यामुळे त्यांच्या मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीने पुन्हा उचल खाल्ली आहे.
धनंजय मुंडे यांचा दिल्ली दौरा आणि भेटीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माहिती दिली आहे. ते म्हणाले, मी माझ्या कामासाठी, तर धनंजय मुंडे हे त्यांच्या कामासाठी दिल्लीला आले होते. आमची भेट सकाळीच झाली होती. कॅबिनेट बैठकीच्या वेळीही आमची भेट झाली होती. धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना भेटणं चोरी नाही. ते मला आणि मी त्यांंना कधीही, कोणत्याही कामासाठी भेटू शकतो.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबतही भाष्य केले आहे. तो कोण घेणार हेही फडणवीस यांनी या वेळी सांगितले. अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजितदादांची जी भूमिका असेल तीच अधिकृत भूमिका आहे, असे फडणवीसांनी स्पष्ट केले. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवल्याचे मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.