Nitesh Rane  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nitesh Rane : 'निधी पाहिजे तर भाजपमध्ये प्रवेश करा', पालकमंत्री राणेंचा अजब फतवा

Nitesh Rane Suggests MVA Members Join BJP : राज्यात भाजप सत्तेत येताच आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना नजरेत धरण्याचे काम सुरू झाले आहे की काय असेच वक्तव्य पालकमंत्री नितेश राणे यांनी केलं आहे. त्यांनी निधी हवा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा, असा अजब फतवा काढला आहे.

Aslam Shanedivan

Sindhudurg News : कोकणात ठाकरे गटाला सध्या राजकीय भूकंपाचे धक्के सोसावे लागत असून अनेक शिलेदार शिवसेनेची साथ सोडत आहेत. सिंधुदुर्ग असो की रत्नागिरी येथे भाजपसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पाडत आहे. अशातच आता सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी थेट महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. तर ज्यांना विकास निधी हवा त्यांनी भाजप प्रवेश करावा, असा अजब फतवा काढला आहे. त्यांच्या या फतव्याची सध्या राज्यभर चर्चा होत असून असाच आदेश राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे का असाही सवाल आता उपस्थित केला जातोय.

ओरोस येथे आयोजित कुडाळ तालुका भाजप मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कुडाळ उपनगराध्यक्ष, काँग्रेसच्या दोन नगरसेविकांसह 600 जणांनी भाजप प्रवेश केला. यावेळी भाजपचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, पक्षाचे राज्य उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई, अॅड. अजित गोगटे आदी उपस्थित होते.

यावेळी राणे यांनी, पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत करताना, भाजप एक परिवार आहे. परिवार म्हणून यापुढे आपण सर्वांनी मिळून काम करू. यापुढे जिल्ह्यात फक्त महायुती दिसली पाहिजे, असे आवाहन केले.

याचवेळी राणे यांनी, विरोधकांना इशारा देताना निधी दिला जाणार नाही, निधी हवा असल्यास भाजपमध्ये प्रवेश करा, असे म्हटले आहे. मी दहा वर्षे विरोधी पक्षाचा आमदार राहिलो असून विरोधी आमदाराला निधी देण्यात पक्षपात केला जातो. तर पोलिस कारवाई देखीिल करण्यात येते. याचा दांडगा अनुभव आला आहे.

त्यामुळे यापुढे महायुती सोडून कोणालाही एकही रुपयाचा निधी दिला जाणार नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांना तर नाहीच. त्यामुळे निधी हवा असल्यास भाजपमध्ये प्रवेश करा. विरोधकांच्या निधीसाठी आपल्यातील कोणीही फोनाफोनी करू नये, असाही दम पालकमंत्री राणे यांनी भरला आहे. यानंतर आता जिल्ह्यात उलट सुलट चर्चांना उधाण आलं असून जिल्ह्यात विरोधीपक्षच शिल्लक ठेवायचा नाही, अशीच भीष्म प्रतिज्ञा पालकमंत्री नितेश राणे घेतल्याचे दिसत आहे.

दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचा बालेकिल्ला असून तो आणखी मजबूत झाला आहे. अनेकांनी येथील मेळाव्यात प्रवेश केला आहे. यामुळे आता सिंधुदुर्गातील जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करायचे असल्याचे प्रतिपादन पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. चव्हाण म्हणाले, मी कोकणातला सुपुत्र म्हणून राज्य सदस्य नोंदणी प्रमुखपदी काम करत आहे. तशीच जबाबदारी कोकण सुपुत्र विनोद तावडे यांच्याकडे संपूर्ण देशभराची आहे.

या संघटनपर्वाची प्रमुख म्हणून जबाबदारी सिंधुदुर्गातील आम्हा दोघांकडे आहे. देशामध्ये साडेतेरा कोटींपेक्षा जास्त प्राथमिक सदस्य झालेले आहेत. महाराष्ट्रातसुद्धा एक कोटी पाच लाखांपेक्षा जास्त सदस्य नोंदणी झाली आहे. आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते पक्षाचे अनेक वर्षे काम करत आहोत. आपण सर्वांनी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष असला पाहिजे, ही जबाबदारी पेलली पाहिजे, असे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT