Rajendra Raut-Devendra Fadnavis-Sachin Kalyanshetti
Rajendra Raut-Devendra Fadnavis-Sachin Kalyanshetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

गुवाहाटीत झालेल्या राजकीय स्फोटाची बत्ती आमदार राऊतांनी बार्शीतून पेटवली : कल्याणशेट्टींचा सत्तापालटाबाबत गौप्यस्फोट

विश्वभूषण लिमये

सोलापूर : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कोरोना महामारीच्या काळात बार्शीत (Barshi) आले होते. त्यावेळी आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी त्यांना भगवंताच्या मंदिरात नेले. मंदिरं बंद असल्याने फडणवीस नको म्हणत होते. मात्र, ‘राज्याला लागलेली साडेसाती (महाआघाडी सरकार) घालविण्यासाठी तुम्हाला दर्शन घ्यावंच लागेल’ असा आग्रह राजाभाऊंनी धरला. फडणवीसांनी भगवंताचे दर्शन घेतले आणि वर्षभरातच महाआघाडीची सत्ता गेली, त्यामुळे राजकीय स्फोट गुवाहाटीत जरी झाला असला तरी त्याची बत्ती राजेंद्र राऊतांनी बार्शीतच पेटवली होती, असा गौप्यस्फोट आमदार तथा भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांनी बार्शीत बोलताना केला. (Guwahati's political explosion was ignited in the barshi : Sachin Kalyanshetti)

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त 'राज्यस्तरीय भगवंत कृषी महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या समारोपाच्या कार्यक्रमात बोलताना कल्याणशेट्टी यांनी वरील किस्सा सांगितला.

आमदार कल्याणशेट्टी म्हणाले की, राज्यात जे सत्ता परिवर्तन झाले, आपल्या सर्वांना माहिती आहे की गुवाहाटीमध्ये त्याचा स्फोट झाला. सत्ता परिवर्तनाचा स्फोट जरी गुवाहाटीमध्ये झाला असले तरी त्या स्फोटाची बत्ती पेटविण्याचे काम बार्शीत आमदार राजेंद्र राऊत यांनी केले आहे. आता तुम्ही म्हणणार की हे कसं झालं. पण मी त्या घटनेला साक्षीदार आहे. राजाभाऊ विसरून गेले असतील मात्र माझ्या डोक्याला जरा व्याप कमी आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट माझ्या चांगलीच लक्षात राहते.

कोरोना काळात देवेंद्र फडणवीस बार्शीत आले होते. रणवीर राऊत यांचे लग्न झाले होते. त्यावेळी ‘फडणवीस यांनी भगवंताचं दर्शन घ्यावे,’ यासाठी राजाभाऊ हटाला पेटले होते. त्यावेळी फडणवीस म्हणाले की, राजाभाऊ मला काही अडचण नाही. पण, पत्रकार लोकं बातम्या लावतात, सर्वसामान्य जनतेसाठी मंदिरं बंद आहेत आणि आपण मंदिर उघडायचं कसं. मीही बाजूला होतो, त्यावेळी मीही ‘भाऊ नको’, चुकीच्या बातम्या लागतील, असे सांगितले, असे कल्याणशेट्टी यांनी नमूद केले.

राजाभाऊ म्हणाले की, कल्याणशेट्टी तुम्ही गप्प बसा. या राज्याला जी साडेसाती लागली आहे. ती फडणवीसांनी भगवंताचं दर्शन घेतल्याशिवाय निघणार नाही. राज्याला लागलेली साडेसाती जाणार असेल तर कुणी बातमी लावो, कुणी टीका करो, आज मी मंदिर उघडायला लावणार आणि भगवंताचं दर्शन घ्यायला लावणार. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही बार्शीला याल, तेव्हा राज्यातील सत्तेचे प्रमुख म्हणून याल. हे त्यावेळी राजेंद्र राऊत यांनी सांगितले होते. त्यावेळी मला भगवंताचा महिमा लक्षात आला. त्यादिवशी तुम्ही मंदिर उघडलं. फडणवीस साहेबांना दर्शन घ्यायला लावले आणि महाराष्ट्राला लागलेली साडेसाती दूर केली. राजाभाऊ तुमच्या प्रेमाखातर फडणवीस हे मंदिरात गेले आणि दर्शन घेतले. भगवंताने तुमचं ऐकलं आणि महाराष्ट्राचं चांगलं झालं.

अगोदर आम्ही सर्वजण निधीसाठी मर मर होतो. पण, ज्या दिवशी देवेंद्र फडणवणीस सत्तेत आले आणि राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या विकासाची सगळी कवाडे उघडी केली, असेही कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT