Hasan Mushrif  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif : केवळ खरडपट्टी नको, हसन मुश्रीफांनी झारीतला शुक्राचार्य बाहेर काढावा !

Rahul Gadkar

Kolhapur News : विकासकामे आणि विकासकामाच्या उद्घाटनाच्या आड येणाऱ्या काही व्यक्तींमुळे कोल्हापूरची राज्यात बदनामी होत आहे. त्यात काही अधिकारी काळ्या मायेला बळी पडल्याने त्यांचे हात दगडाखाली अडकले आहेत. सातत्याने महापालिकेत अधिकाऱ्यांवर कोल्हापूरकरांकडून भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. ही कोल्हापूर महापालिकेतील अधिकाऱ्यांची परिस्थिती आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी वरील कार्यक्रमात आयुक्तांसह अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. १०० कोटींच्या कामांच्या रस्त्यांची वर्क ऑर्डर कुणी थांबवली? किती टक्केवारीसाठी थांबवली, याची मला माहिती असल्याचं खुद्द पालकमंत्री यांनी सांगितल्यानंतर महापालिकेत खळबळ उडाली.

आजवरच्या इतिहासात कोल्हापुरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरसाठी काय भरीव योगदान दिले? यासाठी जनतेला विचारलं तर जनता निरुत्तर आहे. पुढच्या वीस वर्षांचे नियोजन करून किती लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरच्या विकासासाठी कोणता प्रकल्प राबवला? याचे उत्तर सापडणार नाही. काहींनी त्यासाठी प्रयत्नही केले. अशा परिस्थितीत केंद्र किंवा राज्य सरकारकडून एखादी मोठी योजना आल्यास त्यातही कोणता ठेकेदार द्यावा? ठेकेदार आपल्या मर्जीतला असावा, शिवाय ठेकेदार आपल्याला किती टक्के रक्कम देणार? यावर सर्व अवलंबून असते.

काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. कोल्हापुरातील रस्त्यांची स्थिती बघता त्यांनी महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची उचलबांगडी केली. त्या ठिकाणी जल अभियंता हर्षजीत घाटगे यांची शहरा अभियंता म्हणून नियुक्ती केली. आलेल्या संधीचे सोने करणे हे घाटगे यांची जबाबदारी होती. मात्र ते देखील लोकप्रतिनिधींच्या हातातले बाहुले बनले आहेत की काय? असा सवाल जनतेच्या मनात आहे.

कोल्हापुरातील रस्ते प्रकल्पासाठी 100 कोटी मंजूर झाले. त्याची वर्क ऑर्डर थांबवण्यात आली. त्यात 11 टक्के मागणारे आल्याने ही वर्क ऑर्डर थांबवण्यात आल्याची माहिती पालकमंत्र्यांच्या कानावर गेली. आणि भर कार्यक्रमात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली.

पण मुश्रीफ यांनी केवळ खरडपट्टी काढू नये, तसेच पदावरून उचलबांगडी करू नये. त्यांना कायमची अद्दल घडायला हवी. अशी मागणी कोल्हापूरकरांची आहे. कारण महापालिकेच्या इतिहासात आजपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर एकही कडक कारवाई झाली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांवर प्रशासनाचा वचक राहिलेला नाही. केवळ बदली आणि दंडात्मक कारवाई होत असल्याने अधिकारीही गैरमार्ग करण्यास फोफावले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अधिकारीच राबवतात टक्केवारीची मोहीम?

एखादी मोठी योजना आली तर त्याचे कंत्राट कुणाला द्यायचे, याची माहिती लोकप्रतिनिधी संबंधित अधिकाऱ्याला देतात. संबंधित अधिकारी आणि ठेकेदार विशेष टक्केवारी ठरवून संबंधित यंत्रणेला पोहोचवण्याची जबाबदारी अधिकारीच घेत असल्याची माहिती आहे. क्लासवन अधिकारी म्हणून मिरवणारे महापालिकेतील काही अधिकारीच या पापात सहभागी आहेत, असा आरोप मुश्रीफ यांनी केला.

तोंडावरून गोरगरीब दिसणारे भोळे अधिकारी यांच्यामुळेच सामान्य कोल्हापूरकर वेठीस धरला आहे. त्यामुळे स्वाभाविकच पालकमंत्री या नात्याने मुश्रीफ यांच्यावर जनतेकडून ताशेरे ओढले जातात. त्यामुळेच मुश्रीफ यांनी कोल्हापूर महापालिकेतील विकासाच्या आड येणारा अधिकारी झारीतील शुक्राचार्य ओळखून त्याच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.

(Edited by Sachin Waghmare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT