Hassan Mushrif
Hassan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

हसन मुश्रीफ म्हणाले, भाजपने शब्द पाळला नाही म्हणून महाविकास आघाडी झाली

अमित आवारी

अहमदनगर - पारनेर तालुक्यातील पानोली येथे डिजिटल क्लास रुमचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते काल (शनिवारी) सायंकाळी करण्यात आले. या प्रसंगी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ ( Hassan Mushrif ) यांनी भाजपवर मिश्किल शैलीत टीका केली. ( Hasan Mushrif said that Mahavikas Aghadi the lead as BJP did not keep its word )

या उद्घाटन कार्यक्रमाला आमदार नीलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जयसिंग मापारी, संदीप गुंड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांघोरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील आदी उपस्थित होते.

हसन मुश्रीफ म्हणाले, आमदार नीलेश लंके यांनी माझ्याकडे एवढ्या कामांचे निधी मागितले आहेत. की आता निवेदन घेऊन आले तर वाटते की विमानतळ मागतात की काय? त्यांनी सामान्य व्यक्ती असलेल्या शिक्षकाचा मुलगा आमदार होऊ शकतो हे दाखवून दिले आहे. पालकमंत्री म्हणून मी हिमालयासारखा त्यांच्या मागे उभा आहे. संदीप गुंड यांनी डिजिटल स्कूलचे चांगले काम केले आहे. शिक्षणाबाबत दिल्ली पॅटर्नपेक्षाही पारनेर पॅटर्न प्रसिद्ध होईल, असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, कोरोना काळ संपला दोन वर्षे कशी गेली याची कल्पना आली तरी अंगावर काटा येतो. ऑक्टोबर 2020ला विधानसभेचा निकाल लागला. त्यावेळी मला राष्ट्रवादीचा आमदार म्हणून विरोधी पक्षात काम करण्याची संधी मिळाली होती. शिवसेना व भाजपची युती होती. या युती काळात पुन्हा विरोधी पक्षात काम करायचे ही मनात अटकळ बांधली होती. ऑक्टोबर 2020ला पाऊस पडत होता. बाहेर खिडकी उघडली की पाऊस आणि टिव्ही सुरू केला की संजय राऊत अशी स्थिती होती.

अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा शब्द उद्धव ठाकरे यांना भाजपने दिला होता. तो त्यांनी पाळला नाही. म्हणून उद्धव ठाकरे नाराज आहेत. उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री केले. भाजपने शब्द पाळला नाही म्हणून महाविकास आघाडी झाली. शरद पवार यांनी व्युवहरचना केली. सोनिया गांधींनी सहकार्य केले आणि महाविकास आघाडी आज यशस्वी आहे, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

सत्ता स्थापनेनंतर दोनच महिन्यांत कोरोनाची महामारी आली. राज्यातील विकासाचे कोणतेही काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थांबविले नाही. कोरोना महामारीशी संघर्ष करत विकासकामांना प्रचंड निधी दिला. कोरोना उत्तर प्रदेश व दिल्लीत वाढू लागला आहे. पुन्हा कोरोना आपल्या भागात येऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

फाळकेंच्या शब्दाला लंकेंनी दिला मान

या उद्धाटन कार्यक्रमात बोलताना राजेंद्र फाळके यांनी आमदार नीलेश लंके यांना पानोली गाव दत्तक घेण्यास सांगताच आमदार नीलेश लंके उभे राहिले. त्यांनी हातात माईक घेऊन जाहीर केले की, जिल्हाध्यक्षांनी आदेश करायचा. आम्ही आदेश फॉलो करायचा. पानोली गाव मी दत्तक घेणार आहे, असा शब्द आमदार लंके यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT