MLA shambhuraj desai News, Political News updates in Marathi
MLA shambhuraj desai News, Political News updates in Marathi  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

चाळीस रेडे काय करू शकतात याचे प्रायश्चित्त त्यांना मिळाले....शंभूराज देसाई

Umesh Bambare-Patil

सातारा : चाळीस रेडे काय करू शकतात याचे प्रायश्चित्त त्यांना मिळाले आहे, त्यांच्या वक्तव्याला आम्ही फार महत्व देत नाही, अशा शब्दात माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार संजय राऊतांची खिल्ली उडवली. दरम्यान, आगामी काळात युती सरकार होते, तसे आता अडीच वर्षे शिवसेना भाजप एकत्र आहोत, चार आमदारांची संख्या जिल्ह्यातील नक्की वाढवून दाखवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.(Political News updates in Marathi)

माजी मंत्री शंभूराज देसाई आज साताऱ्यात जिल्ह्यात दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ते पाटण मतदारसंघात मदतीसाठी दाखल झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी शासकिय विश्रामगृहात आज पत्रकारांशी संवाद साधला. शंभूराज देसाई म्हणाले, आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार आम्ही मतदारसंघातील जनतेच्या मदतीसाठी दाखल झालो असून आता आम्ही कामाला लागलो आहोत. आमच्या चाळीसही आमदारांचे त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात स्वागत होत आहेत. त्यामुळे शिवसैनिक आमच्यासोबत आहेत हे स्पष्ट होत आहे.

आम्ही गुवाहटीला चाळीस रेडे पाठविलेत अशी संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, हे चाळीस रेडे काय करू शकतात त्याचे प्रायश्चित्त त्यांना मिळाले आहे. मुळात त्यांच्या वक्तव्याला महत्व देणे योग्य वाटत नाही. धर्मवीर चित्रपट काढण्याचे अनेक दिवसांपासन एकनाथ शिंदेंच्या डोक्यात होते. मात्र, कोविडच्या अडचणींमुळे तो पुढे गेला. नारायण राणेंनी आमच्याबद्दल सद्‌भावना व्यक्त केल्या त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे त्यांनी सांगितले.

गुवाहटीला जाण्यापेक्षा तुम्ही खासदार उदयनराजेंच्या जलमंदीरात का आला नाही, या प्रश्नावर ते म्हणाले, आम्ही मुंबईत आलो नाही तर जलमंदीरला कशाला येऊ. पण, जलमंदीराचे नेते हे आमचे मित्र आहेत, त्यांची मैत्री अशीच कायम राहू देत, असे त्यांनी सांगितले. आगामी अडीच वर्षाच्या काळात जिल्ह्याचा धडाकेबाज विकास करण्याचे निश्चित केले असून जिल्ह्याने मागायचे आणि एकनाथ शिंदेंनी द्यायचे इतकेच बाकी आहे.

जिल्ह्यातील शिवसेना व भाजपचे चारही आमदार व एक खासदार आम्ही एकत्र काम करणार आहोत. पालकमंत्री पदाबाबत विचारले असता ते म्हणाले, मी कोणतेही मंत्रीपद मागितलेले नाही. आमच्या बंधूंनीही मला विचारले, पण काही आमदार मंत्रीपदासाठी विनंती करत होते. पण, मी साहेबांना याविषयी काहीही विचारले नाही. मला मंत्री करणार की प्रमोशन देणार, पालकमंत्री करणार का, याविषयी काहीही बोललो नाही. माझा माझ्या नेत्यावर विश्वास आहे.

महाविकास आघाडीची अनैसर्गिक आघाडी झाली होती. ज्यांच्या विरोधात आम्ही मते मागीतली होती. त्यांच्यासोबत बसणे योग्य वाटत नव्हते. उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही बोललो पण त्यांनी ऐकले नाही. दोन अडीच वर्षात आमच्या आमदारांना व शिवसैनिकांना त्रास झाला. सर्व काही सहनशिलतेच्या पलिकडे गेल्याने आम्ही निर्णय घेतला. आगामी काळात पुढील अडीच वर्षे शिवसेना, भाजप आम्ही एकत्र राहणार असून सातारा जिल्ह्यातील चार आमदारांची संख्या नक्की वाढवून दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT