Jaykumar Gore
Jaykumar Gore sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

जिहे-कटापूर योजना पूर्ण झाल्याशिवाय विधानसभेची निवडणूक लढविणार नाही...

रूपेश कदम

दहिवडी : ''जिहे-कटापूरचे पाणी आंधळी धरणात येईल, तेव्हाच मला खरा आनंद होईल. या योजनेला लागणारा ८५० कोटीचा निधी केंद्राकडून देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून लवकरच मिळेल. जिहे-कटापूरचे काम पंचवीस टक्केच पूर्ण झाले असून उर्वरित पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण व्हायचं आहे. जिहे-कटापूरची योजना पूर्ण झाल्याशिवाय मी विधानसभेची निवडणूक लढविणार नाही, हा माझा शब्द आहे, असा विश्वास माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिला आहे.

मलवडी (ता. माण) येथे श्री खंडोबा मंदिर सिमेंट रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन काळे, मलवडीचे सरपंच दादासाहेब जगदाळे, परकंदीचे सरपंच बाळासाहेब कदम, श्रीपालवणचे सरपंच चंद्रकांत सुर्यवंशी, युवा नेते राजू पोळ, उपसरपंच जगदीश मगर, श्री मल्हारी म्हाळसाकांत देवस्थान ट्रस्टचे चेअरमन जगन्नाथ सत्रे, किसन सस्ते, प्रसाद शिंदे, ज्ञानेश्वर मगर, संतोष मगर, सचिन मगर, संजय महाजन, तुळशीराम बोराटे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार गोरे म्हणाले, ''आज ज्या जिहे-कटापूर योजनेचे पाणी पुजण्यासाठी चढाओढ सुरु आहे. ते जिहे-कटापूरचे पाणी जयकुमार आमदार नसता तर आलंच नसतं. जयकुमार होता म्हणूनच पाणी आलं, अन्‌ पाणी पुजायची संधी मिळाली, असे सांगून ते म्हणाले, ''जिथून माझ्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. त्या मलवडीच्या श्री खंडोबा मंदिरातून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याचा संकल्प करतोय. एक सामान्य कार्यकर्ता ते आमदार या प्रवासाची सुरुवात इथूनच झाली. मलवडी हे गाव कायमच माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे.

या गावाच्या विकासासाठी मी नेहमीच सोबत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात उपेक्षित असणारा माण-खटाव हा भाग, माझ्या राजकारणात येण्याने मुख्य पटलावर आला. अगदी माझ्या विरोधकांनाही त्यामुळे न्याय मिळू लागला आहे.'' आमदार गोरे म्हणाले, ''उरमोडी योजनेमुळे माण-खटावमधील जवळपास १०५ गावांना बारमाही पाणी मिळू लागले आहे. जिहे-कटापूरचे पाणी आंधळी धरणात येईल, तेव्हाच मला खरा आनंद होईल.

या योजनेला लागणारा ८५० कोटी केंद्राकडून देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून लवकरच मिळतील. जिहे-कटापूरचे काम पंचवीस टक्केच पूर्ण झाले आहे. उर्वरित पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण व्हायचं आहे. जिहे-कटापूरची योजना पूर्ण झाल्याशिवाय मी विधानसभेची निवडणूक लढविणार नाही, हा माझा शब्द आहे.'' दादासाहेब जगदाळे यांनी मनोगत व्यक्त केले. तर उमेश मगर यांनी आभार मानले.

"विधानसभेच्या पहिल्या दोन निवडणूकांपेक्षा यावेळच्या निवडणुकीतील विजय मला जास्त समाधान देणारा होता. कारण सगळ्यांनी मिळून सगळे प्रयत्न केले होते. अगदी 'सिल्व्हर ओक'मध्ये मला अडविण्यासाठी खलबते झाली होती. ही मला अडविण्याची शेवटची संधी होती. त्यामुळे इथून पुढे माझा पराभव होत नाही."

- आमदार जयकुमार गोरे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT