Tanaji Sawant at Natepute hospital
Tanaji Sawant at Natepute hospital  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'सत्तांतर होऊनही त्यांच्या डोक्यातील हवा अजून गेली नाही; ऑपरेशन करावे लागेल'

सुनील राऊत

नातेपुते (जि. सोलापूर) : राज्यात सत्तांतर होऊन दोन महिने झाले. तरीही काही अधिकाऱ्यांच्या डोक्यातील हवा अद्याप गेलेली नाही. ऑपरेशन करावे लागेल, असा इशारा आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी कामचुकार अधिकाऱ्यांना दिला. (Health Minister Tanaji Sawant warned the authorities)

आरोग्य मंत्रीपदी निवड झाल्यानंतर सावंत हे आज प्रथमच सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्याची सुरुवात माळशिरस (Malshiras) तालुक्यापासून झाली. सोलापूर जिल्हा सरहद्दीवर आमदार राम सातपुते यांनी सावंतांचे स्वागत केले. त्यानंतर नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयाची त्यांनी पाहणी केली. रुग्णालयाच्या पाहणीनंतर आशा वर्कर आणि सेविका यांना कोरोना योद्धा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी सावंत बोलत होते.

सावंत म्हणाले की, राज्यात सत्तांतर दोन महिने झाले. तरीही अनेक अधिकाऱ्यांच्या डोक्यातील हवा अद्याप गेलेली नाही. ऑपरेशन करावे लागेल. मागील अडीच वर्षांत देशातील एक नंबरचे राज्य मागे गेले. ते पुढे आणण्यासाठी आपणास कठोर परिश्रम करावे लागणार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री २४ तास कार्यरत आहेत. ते पूरग्रस्तांच्या डोळ्यातील अश्रू पुसत आहेत.

कोरोना काळात आशा वर्कर आणि नर्सेस यांनी खूप काम केले आहे. तुमच्यावर अन्याय झाला आहे. एसीमध्ये बसून अधिकारी निर्णय घेतात. रस्त्यावर कष्ट करणाऱ्या लोकांना न्याय दिला जात नाही. एसीमधील अधिकाऱ्यांचा पगार कमी करावा का?, हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना चालेल का? पण रस्त्यावर काम करणाऱ्या लोकांना मी न्याय मिळवून देणार आहे. काही अधिकारी जाणीवपूर्वक प्रस्ताव सादर करताना गॅप ठेवतात. ते खुंटी मारण्यात अधिकारी तरबेज असतात. प्रशासनातील स्थूलता ही बाब गंभीर आहे. आमचे कोणी काही करू शकत नाही, ही मानसिकता मोडून काढण्याचे काम करावे लागणार आहे.

तुम्ही चांगले काम करा, जनतेला जे लागते ते द्या. पेशंट नातेवाईकांची काय अवस्था आहे ती पहा. माणसाची भावना लक्षात ठेवून काम करावे. आरएचमध्ये रुग्ण ज्या ठिकाणी राहतात, तेथील व्यवस्था मला मान्य नाही. आमदारांनी आठवड्याला अशा ठिकाणी भेट द्यावी. आमदार राम सातपुते आणि मी मंत्री किंवा आमदार म्हणून नव्हे; तर सेवक म्हणून मी तुमच्यासोबत आहे. जनता हीच खरी देव आहे, तिची सेवा करणे आपले काम आहे, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.

बाहेर पाचशे रुपये रोजगार असताना तुमच्याकडे दीडशे रुपयांवर कोण येणार

तानाजी सावंत यांनी पाहणीदरम्यान अग्निशामक यंत्रणा बंद आहे, ती सुरू करून चालू करण्याचे प्रशिक्षण कर्मचारी, अधिकाऱ्यांना द्यावे. केस पेपरला किती पैसे घेतले जातात? औषधांना, इंजेक्शनला पैसे मागितले जातात का? उपचार कसे मिळतात? बाळंतपण केलेल्या महिलांना जेवण कशा पद्धतीचे पुरवले जाते. त्याचा दर्जा कसा आहे? औषधांचा स्टॉक ठेवला जातो का? स्वच्छता कर्मचारी का नाही? त्यांना दीडशे रुपये रोजंदारी परवडणार का? बाहेर पाचशे रुपये पगार सुरू असताना तुमच्याकडे दिडशे रुपयास कोण येणार?, असा सवाल आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम यांना विचारला. त्यावेळी त्यांनी वरिष्ठांकडे बोट दाखवले.

आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. कंदेवार (मुंबई) यांना फोन लावून राज्यातील सर्व रुग्णालयांत सफाई कर्मचारी नेमण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर द्यावेत. सुधारित किमान पाचशे रुपये वेतन करावे, असे आदेश काढण्यास सांगितले. सफाई कर्मचारी स्थानिक पातळीवर उपलब्ध होतात, त्यासाठी मंत्रालयातील आदेशाची गरज आहे का? असे सवालही त्यांनी अधिकाऱ्यांना केले. शवविच्छेदनासाठी गेली दहा वर्ष कर्मचारी नसल्याचे आमदार राम सातपुते यांनी मंत्री सवांत यांच्या निदर्शनास आणून दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT