Satara, 01 April : सह्याद्री सहकारी साखर काखाना हा (स्व.) यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नांतून उभा राहिलेला आहे, तो कराड तालुक्याची अस्मिता आहे. माझ्या नेतृत्वाखाली सह्याद्री साखर कारखान्याची 1997 ची निवडणूक लढवली हेाती. मात्र, मी कारखान्याचा सभासदही नाही. मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही, त्यामुळे माझ्या नावाचा वापर कोणीही करू नये. मी कोणालाही माझं वकिलपत्र दिलेलं नाही, अशा शब्दांत काँग्रेस पदाधिकाऱ्यांना फटकारताना ‘मला जे काही सांगायचं आहे, ते जनतेला सांगेन,’ असे सूचक विधानही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप आमदार मनोज घोरपडे यांचा पॅनेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचा एक पॅनेल आणि काँग्रेस आणि भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांचा मिळून एक पॅनेल असे तीन पॅनेल निवडणूक लढवत आहेत. त्यातील काही लोक पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचा आम्हाला पाठिंबा आहे, असा दावा करत आहेत, त्यावर पृथ्वीराजबाबा यांनी वरील उत्तर दिले.
ते म्हणाले, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक (Sahyadri sugar Factory election) ही राजकीय प्रक्रिया नाही. कोणताही राजकीय पक्ष ही निवडणूक पक्षीय पातळीवर लढवत नाही. माझी काही सहकाऱ्यांनी काही वक्तव्ये केली आहेत. माझ्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाची बैठक झाली आणि त्यात एका विशिष्ट पॅनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे वक्तव्ये केले आहे. ते खोटारडे आणि दिशाभूल करणारे वक्तव्ये आहे.
मी कोणालाही माझं वकिलपत्र दिलेले नाही. माझी बाजू लोकांसमोर जाऊन मांडा, असे मी कोणालाही सांगितलेले नाही. मी माझी बाजू मांडायला समर्थ आहे. जे कोणी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते माझ्या नावाचा खोटा आणि चुकीचा वापर करत असतील किंवा कुठल्या पॅनेला पाठिंबा दिल्याची वक्तव्ये करत असतील तर ते अत्यंत चुकीचे आहे. काँग्रेस पक्षाचा यामध्ये काहीही संबंध नाही. प्रत्येक भागधारकाला कारखाना कसा चालला आहे, हे माहिती आहे. कारखान्याची आजची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे, ती सुधारण्यासाठी कोण योग्य भूमिका निभावू शकेल, याचा निर्णय घेण्यासाठी कारखान्याचे सभासद समर्थ आहेत, असा दावाही चव्हाण यांनी केला.
ते म्हणाले, कोणीतरी माझ्या वतीनं सांगायचं की ‘मी असं सांगितलं आहे’, हे पूर्णपणे चुकीचं आहे. अशी कोणी दिशाभूल आणि संभ्रम निर्माण करणारं व्यक्तव्य करू नये. मला काही सांगायचं असेल ते मी लोकांना नक्की सांगेन. पण, मी सह्याद्री साखर कारखान्याचा सभासद नाही. माझ्या जवळचे कार्यकर्ते ह्या कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेत आहेत. कारखाना चांगला चालला नाही तर लोकांचं नुकसान होतं. त्याचा ऊस जात नाही, या सर्व प्रक्रिया आहेत. त्यामुळे लोक आमच्याकडे येऊन तक्रार करतात. काही तरी करा, असे ते म्हणतात. पण आता त्यांनी निर्णय घ्यायचा आहे.
सह्याद्री कारखाना निवडणुकीतील काही लोकं मला येऊन भेटली. त्यानं मी सांगितलं की, मला जो कोणी भेटायला येईल, त्याला मी भेटेन. कुठल्याही गटाचा असला तरी मी प्रत्येकाला भेटलो आहे. मी भेटणार नाही, असे कोणालाही सांतिलेलं नाही. कारण मी लोकप्रतिनिधी होतो, लोकांची गाऱ्हाणी, मते ऐकून घेतलीच पाहिजेत. प्रत्येकाने आपापली मतं मांडली आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत माझ्या नावाचा खोटा प्रचार, गैरप्रचार करू नये, अशी माझी विनंती आहे. मला कोणी विचारलं, तर मला जे काही सांगायचे आहे, ते मी सांगेन. मी जर सह्याद्री साखर काखान्याचा सभासद असतो, तर नक्कीच भूमिका घेतली असती. मी एकदा सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवली होती. माझ्या नेतृत्वाखाली सह्याद्री साखर कारखान्याची 1997 ची निवडणूक लढवली हेाती. पण, आपण जर सभासद नसू, आपण संचालक मंडळात बसणार नसू, साखर संचालकांकडे जाणार नसू, तर मंत्र्यांना भेटणार नसू, तर मग जबाबदारी किती घ्यायची. सल्ला विचारला तर बाहेर राहून तो देता येईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.