Dr. Sujay Vikhe Patil
Dr. Sujay Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मला देवाने दुरदृष्टी दिली म्हणून मी भाजपमध्ये गेलो

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. या निवडणुकीत शिवसेनेचा दारूण पराभव झाला. गोवामध्ये तर शिवसेनेला ( Shivsena ) नोटापेक्षाही कमी मते मिळाली. या परिस्थितीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) व खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी भाष्य करताना शिवसेनेसह महाविकास आघाडीवर टीका केली. ( I joined BJP because God gave me vision )

अहमदनगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. सुजय विखे पाटील यांनी राज्यातील काँग्रेसच्या सध्य स्थिती बाबत सांगितले की, मला परमेश्वराचे आभार मानायचे आहेत. मला त्यांनी दुरदृष्टी दिली होती की, काँग्रेस पक्षाची ही अवस्था होणारच होती. म्हणून मी वेळे अगोदर भाजपमध्ये गेलो. महाराष्ट्रातही काँग्रेस लाचार पक्ष झाला आहे. राज्यातील राजकीय चर्चेत काँग्रेसचे कोणी दिसते का? महाराष्ट्रातील सरकार राष्ट्रवादी काँग्रेस चालवत आहे. शिवसेना एक डमी मुख्यमंत्री म्हणून काम करते आणि या लग्नाला काँग्रेस बिनबोलावलेला वराती म्हणून तेथे जेवायला जाते, अशीही महाविकास आघाडीची रचना असल्याची टीका खासदार विखे पाटलांनी केली.

शिवसेने विषयी बोलताना ते म्हणाले की, जनताच त्यांना मतांतून जागा दाखवत असल्याने मी त्या पक्षा विरोधात बोललो नाही. जनतेने जागा दाखविल्यावर त्यांना जाग येते. शिवसेनेची नोटा बरोबर एवढी चांगली स्पर्धा होते आणि ते नोटालाही मागे टाकू शकले नाहीत. त्यांचे जे प्रभारी रोज टिव्ही समोर येऊन बोलतात त्यांच्या बोलण्याचे रोज जनतेला किती त्रास होतो आहे. त्यांच्या बातम्या गोव्यापर्यंत लोकांनी पाहिल्या व त्यांना लोकांनी नाकारले. आता तरी त्यांनी टिव्ही समोर येणं टाळल पाहिजे. उगीच बेछुट आरोप त्यांनी बंद केले पाहिजेत. लोकांसाठी काम करा. लोकांसाठी काम केलं तर लोक मत देतील, असे सुजय विखे पाटलांनी सांगितले.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, शिवसेनेची मंडळी ही जनतेच्या करमणुकीचे साधन झाले आहे. त्यांनी 50 पैसे, एक रुपयाची तिकीटे लावून जनतेची करमणूक केली पाहिजे. त्यांना गोव्यात नोटा एवढीही मते मिळू नये, ही शोकांतिका आहे. शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी शिवसेनेचे युवा नेते गेले. ज्या मतदार संघात प्रचार केला. त्या मतदार संघात अवघी 22 मते मिळाली. उत्तर प्रदेशात गेले. मोठ मोठ्या वल्गणा केल्या. तेथे काय परिस्थिती आहे.

ते पुढे म्हणाले की, मला उद्धव ठाकरे यांना आवाहन करायचे आहे की, या परिस्थितीकडे पाहून आत्मपरीक्षण करावं. हे जे बोलघेवडी माणसं तुम्ही पक्षात पुढे केली आहेत. त्याने पक्षाची अधोगतीचं होईल. त्यामुळे शिवसेनेला भविष्यात कोणी गांभीर्याने घेईल, असे मला वाटत नाही, अशी टीकाही आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT