Ramesh Kadam
Ramesh Kadam Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ramesh Kadam Sabha : कदमांचा टोला नेमका कोणाला? अजितदादांना की पाटलांना?; ‘अनेक मोठी लोकं स्वतःचं घर सोडून...’

राजकुमार शहा

Mohol News : गेल्या तीन-चार महिन्यांत राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले. अनेक मोठंमोठी लोकं स्वतःचं हक्काचं घर सोडून दुसऱ्याच्या घरात गेली. राजकीय स्वार्थासाठी त्यांनी त्या ठिकाणी स्वतःचा घरोबा निर्माण केला. सत्तेसाठी स्वतःच्या हक्काचे घर सोडून त्या ठिकाणी नवीन संसार सुरू केला. राजकारणात सत्तेसाठी काहीही करणारी माणसं आपण पाहतो. ती गावात, तालुक्यात, जिल्ह्यात आणि राज्य सरकारमध्ये आहेत, असा टोला माजी आमदार रमेश कदम यांनी कुणाला उद्देशून लगावला, याची चर्चा मोहोळ विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. (I Will contest assembly election from Mohol: Ramesh Kadam announced)

दरम्यान, अफवांवर विश्वास ठेवू नका. मी मतदारसंघात पुन्हा येणार आहे. विधानसभेची आगामी निवडणूक मोहोळ मतदारसंघातून लढविणारच, असा ठाम निर्धारही माजी आमदार रमेश कदम यांनी या वेळी बोलून दाखवला.

मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांना तब्बल आठ वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.आठ वर्षांनंतर मतदारसंघात येऊनही माजी आमदार कदमांची पूर्वीचीच क्रेझ कायम असल्याचे दिसून आले. कदम यांचे मोहोळमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. विशेषतः तरुणाई मोठ्या संख्येने जमली होती. मोहोळचा उड्डाणपूल आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रचंड गर्दी झाली होती.

रमेश कदम म्हणाले की, आज मला तुम्हा सर्वांचा अभिमान वाटतो, कारण माझ्यासारखा लहान कार्यकर्ता भ्रष्टाचाराच्या खोट्या आरोपाखाली आठ वर्षे तुरुंगात होता. या आठ वर्षांत मोहोळ मतदारसंघातील जनतेशी माझा संपर्क नव्हता, त्यामुळे अनेकांनी मला सांगितले की, आता तुम्हाला कोण ओळखणार, कोण तुमच्या स्वागताला येणार, तुमच्यासोबत कोण काम करणार. तेव्हा मी त्यांना एकच सांगितले की, मोहोळमधील लोक प्रमाणिक असून, केलेल्या कामाची त्यांनी जाणीव राहते. निवडून आल्यानंतर सात ते आठ महिनेच काम करता आले. त्यावेळी आम्ही मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ता हा उपक्रम राबविला होता.

आठ वर्षांनंतर मला जामीन मिळाला. मात्र, गेल्या महिनाभरात अनेक अफवा उठविण्यात आल्या. रमेश कदम मागे जसा तीन दिवसांसाठी बाहेर आला होता, तसा तो पुन्हा काही दिवसांसाठी बाहेर आला आहे, तो पुन्हा तुरुगात जाणार आहे, असे सांगण्यात आले. पण उच्च न्यायालयाने मला कायमचा जामीन दिला आहे. त्यामुळे मी कायम तुमच्या संपर्कात राहणार आहे. माझ्या कुवतीप्रमाणे मतदारसंघातील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आहे, असेही कदम यांनी स्पष्ट केले.

कदम यांनी सांगितले की, दर महिन्यात पंधरा दिवस मोहोळमध्ये येणार आहे. मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ता हा उपक्रम पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका. मी पुन्हा या मतदारसंघात येणार आहे. तुम्ही मला सांगितलं तर मी मोहोळमधून विधानसभेची निवडणूकही लढविणार आहे.

गेल्या महिनाभरात मला अनेक मान्यवरांकडून विचारणा झाली आहे. अनेक नेत्यांचे फोन आले. आमच्याकडे या, असा आग्रह केला. पण मोहोळ मतदारसंघातील लोक सांगतील, त्याप्रमाणे मी राजकीय निर्णय घेणार आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या लोकांनी माझ्या स्वागताचे बॅनर लावले होते, त्यांनाही आगामी काळात सोबत घेण्यात येणार आहे. पंढरपूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांतही विकासकामे करण्याचा माझा प्रयत्न आहे

कदम राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार

माजी आमदार कदम यांना प्रसारमाध्यमांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्या गटात जाणार असे विचारले असता, मी खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनाही भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले, त्यामुळे लोकांची उत्सुकता आता ते कोणत्या गटात सामील होणार, यासाठी शिगेला पोचली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT