Dilip Mane
Dilip Mane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

२०१९ मध्ये घाई करून चूक झाली : शिवसेना प्रवेशावर दिलीप माने यांचे प्रथमच भाष्य!

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore), सदाशिवभाऊ पाटील (Sadashivbhau Patil) आणि मी आमदार असताना तत्कालीन मंत्री पतंगराव कदम (Patangrao Kadam) यांच्या केबिनमध्ये एकत्र बसायचो. त्यावेळी आम्ही तिघंही काँग्रेसमध्ये होतो. आज सदाशिवभाऊ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP), तर जयकुमार गोरे हे भाजपमध्ये (BJP) आहेत. माझा अजून काय पत्ता नाही. बघू पुढे. एकदा घाई करून चूक झाली आहे, असे सांगून २०१९ मध्ये शिवसेना प्रवेशाचा निर्णय चुकला, अशी अप्रत्यक्ष कबुलीच माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) यांनी आज दिली. (In 2019, a mistake was made in haste : Dilip Mane's first comment on Shiv Sena entry!)

उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे येथील सिद्धनाथ शुगर मिल्स या साखर काखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ भाजप आमदार जयुकमार गोरे आणि राष्ट्रवादीचे नेते सदाशिवभाऊ पाटील यांच्या हस्ते मोळी टाकून करण्यात आला. त्या कार्यक्रमात स्वागतपर भाषणात बोलताना माने यांनी ही कबुली दिली आहे. त्यावेळी दिलीप माने यांनी शिवसेनेत प्रवेश करून सोलापूर 'शहर मध्य’मधून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यावर त्यांनी प्रथमच भाष्य केले आहे.

माने म्हणाले की, जयकुमार गोरे यांचा संघर्ष मला, सदाशिवभाऊ आणि पतंगराव कदम यांना माहिती आहे. आम्ही त्यावेळी कदम यांच्याकडे एकत्रित बसायचो. आज सदाशिवभाऊ आणि जयकुमार गोरे दोघेही वेगवेगळ्या पक्षात असले तरी आमच्या तिघांचं मैत्रीचं, आपुलकीचं नातं कायम आहे. केवळ एका फोनवर हे दोघे आपल्या कारखान्याच्या गाळप हंगामाला उपस्थित राहिले आहेत.

आपल्या पाहुण्यांच्या स्वागताला वरुणराजानेही हजेरी लावली आहे. आमचं २० ते २५ वर्षांपूर्वीचं कारखान्याचं लायन्स होतं. त्यावेळी नुकतीच खासगी कारखान्याला सुरुवात झाली होती. त्यावेळी दोन कारखान्यांचं लायन्स मी काढलं होते. एक होतं सिद्धनाथ कारखान्याचं आणि दुसरं मोहोळ तालुक्यात कारखाना काढण्यासाठी घेतलं होतं. तिऱ्हे आणि परिसरातील शेतकरी तेव्हा चारशे आणि पाचशे रुपये दराने ऊस कारखान्याला घालत होते. त्यावेळी सहकारी कारखान्यात कुठे एन्ट्री मिळत नव्हती. या भागातील शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी (स्व.) ब्रम्हदेवदादा माने यांचं साखर कारखाना उभाण्याचं स्वप्न होतं. त्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली. त्यात त्यांनी खासगी कारखाना काढण्याचे ठरविले. त्याला प्रतिसादही मोठा मिळाला. त्यानंतर सिद्धनाथ कारखान्याचे भूमिपूजन झाले. पण २००२ मध्ये त्यांचे निधन झाल्याने ते हयात असताना हा कारखाना होऊ शकला नाही, असेही दिलीप माने यांनी नमूद केले.

लोकांच्या मनातील नटबोल्ट विकून खाणारा माणूस बाहेर काढला

माजी आमदार माने म्हणाले की, ब्रम्हदेवदादांच्या निधनानंतर चर्चा सुरू झाली की, दिलीप माने काय कारखाना काढणार, ते तर नटबोल्ट विकून खाणार. आपण कुणाच्या तोंडाला हात लावणार. पण, कारखान्याचं फाउंडेशन झालं होतं. चार ते पाच वर्षे थांबून २००९ मध्ये म्हणजेच मी आमदार होण्याच्या अगोदर आपल्याला काहीही करून कारखाना उभा करायचा आहे. लोकांच्या मनातील नटबोल्ट विकून खाणारा माणूस आहे, याला आपल्याला साखरेत रुपांतर करायचं आहे, असे ठरवून आम्ही अवघ्या नऊ महिन्यांत सिद्धनाथ कारखाना उभा केला. पहिल्याच वर्षी पाच लाख टन उसाचे गाळप करून दाखवलं. त्यानंतर लोकांच्या मनातील ‘नटबोल्ट’ गेले.

सोलापुरील सर्व पुढाऱ्यांचे साखर कारखाने

तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ या गावीही दुसरा कारखाना काढला. हे दोन्ही कारखाने दुष्काळाचं एक वर्ष सोडलं तर संपूर्ण क्षमतेने गाळप करतो. आम्ही कारखाना सुरू केला, तेव्हा सोलापूर जिल्ह्यात १४ ते १५ कारखाने होते, आता ३७ साखर कारखाने झाले आहेत. गाळप हंगामाच्या शुभारंभाला कोणाला बोलवायचे, असा प्रश्न पडला. कारण, सोलापूर जिल्ह्यातील सर्वच पुढाऱ्यांचे साखर कारखाने आहेत, त्यामुळे आम्ही माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील आणि आमदार जयकुमार गोरे यांना बोलविण्याचे ठरविले आणि एका फोनवर हे दोघेही आपल्या काखान्याच्या गाळप हंगाम कार्यक्रमाला आले, असे माने यांनी सांगितले.

हप्ता राहिला म्हणून विचारतील; पण सिद्धनाथलाच ऊस घालतील

गाळपाला ऊस आणत असताना आम्ही थोडं भावनिक आहोत. आम्ही राजकारणात आहोत. ऊस आणायला एकदा-दुसरा दिवस लागला तर बाह्याच वर करतात लोक. पण आमचे कार्यकर्ते तसे नाहीत, समजदार आहेत. दोन दिवस इकडे तिकडे होईल, पण सिद्धनाथलाच ऊस घालणारे आमचे हे पठ्ठे कार्यकर्ते आहेत. बिलाला थोडा उशीर होईल. साखर दिली नाही; म्हणून विचारतील. गावात कार्यक्रमाला गेल्यावर राहिलेला हप्ता कधी देणार; म्हणून विचारतील. पण, सिद्धनाथ काखान्यालाच ऊस घालतील, अशा शब्दांत सभासदांच्या पाठिंब्याबद्दल त्यांनी कौतुकाचे उद्‌गार काढले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT