Rajesh Patil
Rajesh Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

स्वकीयांनी केलेला घात विसरणार नाही; भविष्यात हिशेब करू : राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक

सरकारनामा ब्यूरो

गडहिंग्लज : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत स्वकीयांनीच आपल्या उमेदवारांचा घात केला. तो माझ्या कायम स्मरणात राहील. पण, त्याचा हिशेब भविष्यात पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) आमदार राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी स्वकीयांना दिला. (In election of Gokul Dudh Sangh, Swakis defeated their own candidates: Rajesh Patil)

गोकुळ दूध संघाची निवडणूक होऊन आता जवळपास एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या निवडणुकीतील राजकीय डावपेच हळूहळू उलघडू लागले आहेत. अनेकांचा या निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला आहे, ते आपल्या मनातील खंत बोलून दाखवत आहेत. त्यातूनच गडहिंग्लज तालुक्यातील मांगनूर तर्फे सावतवाडी येथील विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना आमदार पाटील यांनी आक्रमक होत वरील खळबळजनक आरोप केला आहे. दरम्यान, त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत आघाडीतून चंदगड तालुक्यामधून माझी पत्नी, तर गडहिंग्लजमध्ये प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी देण्यात आली होती. ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी करण्यात आलेली आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी निष्ठा ठेवून निवडणुकीत काम होणे अपेक्षित होते. मात्र, तालुक्यामधील काही स्वकीयांनीच आमचा घात केला आहे. त्यामुळेच आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे.

गोकुळमध्ये तीन ते चार संचालक असणारे चंदगड-गडहिंग्लज हे तालुके आज दूध संघात अडगळीत पडले आहेत. स्वकीयांकडून गडहिंग्लजमध्ये झालेला घात आगामी काळातही माझ्या आठवणीत कायम राहणार आहे. त्याचा हिशेब वेळ येईल तेव्हा पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. ही घातकी प्रवृत्ती गडहिंग्लज तालुक्यात अनुभवण्यास मिळणे मोठे दुर्दैवी आहे, अशी खंतही आमदार पाटील यांनी बोलून दाखवली.

राजेश पाटील यांनी सांगितले की ‘‘(स्व.) बाबासाहेब कुपेकर, (स्व.) नरसिंगराव पाटील आणि (स्व.) सदाशिवराव मंडलिक यांच्या पक्षनिष्ठा आणि नीतिधर्माच्या छत्रछायेखाली आपण सर्व कार्यकर्ते वाढलेले आहोत. आपण सर्वांनी त्यांच्या नीतीधर्मानेच एकत्रितपणे पुढे जाण्याची गरज आहे. पक्षाशी गद्दारी करणारे कधीही यशस्वी झालेले नाहीत. दिवस बदलत असतात. पण, नीती आणि निष्ठा अखेरपर्यंत कायम राहते. त्याच मार्गाने सर्वांनी जाण्याची गरज आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांनी निष्ठेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहावे. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत डोके वर काढलेली घातकी प्रवृत्ती तालुक्यात वाढू देऊ नका. अशी घातकी प्रवृत्ती जनतेनेही वेळीच ठेचून काढावी. त्यामुळे प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय होणार नाही, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT