Samadhan Autade
Samadhan Autade Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

समाधान आवताडेंनी पहिला डाव जिंकला... समविचाराचे ३६ अर्ज पहिल्या झटक्यात बाद!

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (जि. सोलापूर) : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा पहिला डाव आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade) यांनी जिंकला आहे. पहिल्याच टप्प्यात समविचारी गटाच्या ३६ उमेदवारांच्या अर्जांवर आक्षेप घेत ते छाननीत बाद करत विरोधी गटाला कुमकुवत करण्यात यश मिळविले आहे. (In the election of Damaji Sugar Factory, 36 applications of samvichari group were rejected)

दामाजी साखर कारखान्याच्या गतनिवडणुकीत समाधान आवताडे हे यशस्वी झाल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा विधानसभेकडे वळवला. त्यात २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना अपयश आले. मात्र, गतवर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत यांनी आपला विधानसभेचा मार्ग सुकर केल्यामुळे तालुक्यात त्यांच्या गटाचे राजकीय बस्तान बसण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत पराभूत करून आवताडे यांच्या राजकीय अस्तित्वाला सुरुंग लावण्यासाठीची तयारी करत समविचारी गटाने एकत्र येऊन लढा देण्याचा निर्णय घेतला. मात्र, सलग तीन वर्षे ऊस पुरवठा केला नसल्याच्या कारणावरून या गटातील जवळपास प्रमुख ३६ मातब्बर उमेदवार आखाड्यातून बाहेर काढले. समविचारी गटानेदेखील बळीराजा पतसंस्थेचे थकबाकी असल्याच्या कारणावरून सत्ताधारी गटाच्या उमेदवारावर हरकत घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांची हरकत मजबूत स्वरूपाची नसल्यामुळे त्यांनी घेतलेली हरकत फेटाळून लावण्यात आली.

वास्तविक पाहता मंगळवेढा तालुक्यात इतर कोणत्याही निवडणुकीपेक्षा दामाजी कारखाना निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंचायत समिती सदस्य होण्यापेक्षा दामाजी कारखान्याचा संचालक होण्यास अधिक पसंती तालुक्यात दिली जाते. मात्र, गेल्या पाच वर्षात या परंपरेला आमदार आवताडे यांनी छेद दिला, त्यामुळे अनेकांनी दामाजीच्या आखाड्यातून आवताडे गटाला बाजूला काढण्यासाठी गेली वर्ष ते दोन वर्षांपासून तयारी सुरू केली आहे. मात्र त्यांचेच अर्ज छाननीत बाद झाल्यामुळे ही तयारी अपयशी ठरली आहे.

आता आमदार आवताडे गटासमोर समोर प्रबळ प्रतिस्पर्धी परिचारक गटाचे उमेदवार जरी असले याबाबत त्यांची भूमिका प्रशांत परिचारक हेच निश्चित करणार आहेत, त्यामुळे त्यांची भूमिकादेखील आवताडेंसाठी महत्वाची आहे. दामाजी कारखान्यासाठी तुल्यबळ स्पर्धकांचा सध्यातरी अभाव असला तरी यापुढील काळात राजकीय गणिते कशी जमतात, यावरच दामाजीची लढत अवलंबून आहे.

निवडणुकीला पात्र ठरवण्यासाठी जोडण्यात येणाऱ्या दाखल्यावरून मंगळवेढा तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यापूर्वी भोसे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बनावट दाखल्यावरून उमेदवाराला उच्च न्यायालयापर्यंत धाव घ्यावी लागली. सभासदावरून उच्च न्यायालयातील याचिका फेटाळली गेली. दामाजीचा संचालक होण्यासाठीचा अर्ज पात्र ठरावा; म्हणून अनेकांनी ऊस पुरवठा केल्याबाबत बोगस दाखल्याचा आधार घेतला. मात्र, दामाजीच्या विद्यमान संचालकाला थकबाकीच्या संदर्भात जोडलेले दाखले संशयास्पद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असली तरी दाखले देणारे सध्या बिनधास्त आहेत, त्यामुळे भविष्यात बोगस दाखला देणाऱ्याही चाप लावण्याची गरज आहे; अन्यथा अशा निवडणुकीसाठी पात्र ठरण्यासाठी देखील उमेदवार लाखोंच्या रकमा खर्ची टाकाव्या लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT