Abhijit Patil
Abhijit Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अभिजीत पाटलांच्या कारखान्यांसह घरावर दुसऱ्या दिवशीही इन्कम टॅक्सची कारवाई

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूरचे (Pandharpur) साखर कारखानदार (Sugar Factory) अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांच्या साखर कारखान्यांसह घर आणि कार्यालयांवर प्राप्तीकर विभागाने (Income tax) एकाच वेळी छापेमारी केली आहे. प्राप्तीकर विभागाकडून दोन दिवसांपासून कारवाई सुरु आहे. पुणे विभागातील अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात काय हाती लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्राप्तीकर विभागाच्या या छापेमारीमुळे सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) साखर कारखानदारांमध्ये मात्र मोठी खळबळ उडाली आहे. (Income tax action on Abhijit Patil's house & Sugar factories on the next day too)

अभिजीत पाटील यांचे पंढरपुरातील निवासस्थान, सोनालिका ट्रॅक्टरचे शोरुम, डीव्हीपी पतसंस्था, कार्यालयासह बीड, उस्मानाबाद, नांदेड, सांगोला, नाशिक येथील साखर कारखान्यावरही प्राप्तीकर विभागाने कारवाई सुरु केली आहे. गुरुवारी (ता. २५ ऑगस्ट) सकाळी सुरु झालेली कारवाई दुसऱ्या दिवशीही सुरुच आहे. त्यामुळे या कारवाईकडे डीव्हीपी उद्योग समुहातील इतर त्यांच्या सहकाऱ्यांचीही चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

कोण आहेत अभिजित पाटील?

वय अवघे ३८ वर्षे असलेल्या अभिजीत पाटील यांनी अनेक साखर कारखान्यांचे राज्यात साम्राज्य उभे केले आहे. पाटील यांचे पंढरपूरपासून दहा किलोमीटर अंतरावर देगाव हे मूळगाव आहे. गावात वडिलोपार्जित मोठी शेतीवाडी आहे. पंढरपुरात त्यांच्या अनेक ठिकाणी जागा आहेत. वाडवडीलांपासून त्यांच्या घरात लक्ष्मीचा वास आहे. उच्चशिक्षीत असलेल्या अभिजीत पाटील यांनी सुरुवातीला ऊस वाहतूक ठेकेदार म्हणून व्यवसाय सुरु केला. त्यानंतर त्यांनी काही वर्षे वाळू ठेकेदारीचाही व्यवसाय केला. पुढच्या काळात पाटील यांनी मागे वळून पाहिलेच नाही. लवकरच त्यांनी उस्मानाबद येथील धाराशिव साखर कारखाना विकत घेतला.

व्यावसायिक दृष्टीकोन असलेल्या अभिजीत पाटील यांनी अवघ्या १० ते १२ वर्षात चार साखर कारखान्यांचे साम्राज्य निर्माण केले आहे. त्यांच्याकडे उस्मानाबाद, नांदेड, नाशिक, बीड या ठिकाणी खासगी कारखाने आहेत. तर सांगोला येथील साखर कारखाना राज्य सहकारी बॅंकेने त्यांना मागील वर्षी चालवण्यास भाडेतत्तवावर दिला आहे. सुमारे १२ वर्षे बंद असलेला सांगोला साखर कारखाना त्यांनी सुरु केला. अलीकडेच पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके, कल्याणराव काळे द्वयींचा पराभव करुन कारखान्यावर सत्ता मिळवली. सध्या ते विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष आहेत. बंद पडलेला कारखानाही त्यांनी सुरु केला आहे.

साखर कारखान्यांच्या माध्यमातून त्यांनी डीव्हीपी मल्टीस्टेट बॅंकेची ही स्थापना केली आहे. या बॅंकेच्या अनेक शाखा आहेत. कोरोना काळात अभिजीत पाटील यांनी देशातील पहिला ऑक्सिजन निर्मितीचा प्लॅन्ट सुरु केला होता. त्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी त्यांच्या या कामाचे कौतुक केले होते. कोरोना काळात रुग्णांसाठी त्यांनी हाॅस्पिटलदेखील सुरु केले होते. आपल्या जवळच्या तरुणांना रोजगार मिळावा, त्यांनी व्यवसाय सुरु करावा; म्हणून त्यांनी डीव्हीपी उद्योग समूहाची स्थापनाही केली आहे. या समुहाच्या माध्यमातून अनेक तरुणांना त्यांनी रोजगारदेखील मिळवून दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT