Ujwala Thite-Rajan Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Angar Nagar Panchayat : राज्याचे लक्ष लागलेल्या अनगर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंचा अर्ज पात्र की अपात्र?; निवडणूक अधिकारी म्हणाले...

Ujwala Thite VS Rajan Patil : अनगरमध्ये १७ नगरसेवक बिनविरोध झाल्यानंतरही नगराध्यक्षपदाची निवडणूक होत असून भाजपच्या प्राजक्ता पाटील, राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे आणि अपक्ष सरस्वती शिंदे असे तीन उमेदवार रिंगणात आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 18 November : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उज्ज्वला थिटे यांनी मोठ्या पाेलिस बंदोबस्त उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या उमेदवारीमुळे १७ नगरसेवक बिनविरोध होऊनही नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लागली. उमेदवारी अर्जांची आज (ता.) छाननी असून अनगरमध्ये नगराध्यक्षपदासाठी केवळ तीनच अर्ज आलेले आहेत. त्यात माजी आमदार राजन पाटील यांनी सून प्राजक्ता पाटील यांचा भारतीय जनता पक्षाकडून अर्ज भरण्यात आलेला आहे, तर सरस्वती शिंदे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. तिसरा अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसच्या थिटे यांचा आहे.

अनगर (Angar)नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी अवघे तीन अर्ज असूनही दुपारी साडेतीन वाजले तरीही छाननीचे काम सुरूच होते. उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज राहणार की नाही, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कारण त्यांचा अर्ज अपात्र ठरल्यास दुसरा अपक्ष उमेदवार माघार घेण्याची जास्त शक्यता आहे, त्यामुळे नगराध्यक्षपदी माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनेची वर्णी लागू शकते.

उज्ज्वला थिटे यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या पोलिस (Police) बंदोबस्तात अनगरमध्ये जाऊन अर्ज भरला होता, त्याची संपूर्ण राज्यात चर्चा झाली होती. थिटे यांच्या उमेदवारीमुळे अनगरमधील तब्बल ६५ वर्षांची बिनविरोधची परंपरा खंडीत झाली आहे, त्यामुळे थिटे यांचा अर्ज छाननीत पात्र ठरणार की अपात्र होणार?, याची राज्यभरात उत्सुकता आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणाले

अनगर नगरपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक काम पाहत आहेत. उमेदवारी अर्जाच्या छाननीसंदर्भात त्यांना विचारले असता अजूनही छाननी पूर्ण झाली नसल्याचे त्यांनी साडेतीनच्या सुमारास सांगितले. अर्जाच्या संदर्भातील निर्णय सायंकाळी पाच वाजता माध्यम प्रतिनिधींसमोर जाहीर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

वकिलांची मोठी फौज तयार

उज्ज्वला थिटे यांनी कायदेशीर नियमांचा आधार घेऊन उमेदवारी अर्ज भरला आहे. वकिल आणि तज्ज्ञ नेतेमंडळींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपला अर्ज तयार केलेला आहे, त्यानंतरही अर्ज बाद झाल्यास न्यायालयात धाव घेण्याची तयारी थिटे यांनी केली आहे. त्यासाठी वकिलांची मोठी फौज तयार ठेवण्यात आल्याची माहिती आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे या वकिलांचेही लक्ष लागलेले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT