'Govardhan Sarala Samajwadi Janrajya'
'Govardhan Sarala Samajwadi Janrajya' Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'गोवर्धन सराला समाजवादी जनराज्य'च्या विलिनीकरणाला झाली 75 वर्षे

सरकारनामा ब्युरो

महेश माळवे

Shrirampur : आजच्या दिवशी 17 सप्टेंबर 1948 रोजी ज्याप्रमाणे हैदराबादसह अनेक संस्थांना विलीन झाले. त्याचवेळी इंग्रज व निजामांची सत्ता धुडकावून लावणारे 'गोवर्धन सराला समाजवादी जनराज्य'ही भारतात विलीन झाले. रजाकारांशी लढा देताना शहीद झालेल्यांचे या ठिकाणी उभे राहिलेले हुतात्मा स्मारक आजही येथील लढ्याची साक्ष देते.

भारतावर इंग्रजांनी राज्य केले हा इतिहास असला तरी श्रीरामपूरजवळ सराला, गोवर्धन, भामाठाण व महांकाळवाडगाव ही चार गावे मिळून एक 'गोवर्धन सरला समाजवादी जनराज्य' हे राज्य आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवून होते. येथील ग्रामस्थांनी इंग्रजांबरोबरच हैदराबाद निजामाच्या रजाकारांशी लढा दिला. यावेळी अध्यक्ष विजेंद्र काबरा, महसूल व स्थानिक व्यवस्थापन मंत्री प्रभाकर हरदास, अंतर्गत सुरक्षामंत्री केशवराव कुलकर्णी, सेनापतींचे अंगरक्षक काशिनाथ जगताप, साहेबराव जगताप, दशरथ मोरे, गुप्तचर विभाग सखाराम चिंतावर व सुधाकर देशपांडे, शस्त्रक्रिया प्रमुख मगनसिंह राजपूत, अर्थसहाय्य राजकंवर काबरा, रामपाल बाहेती, परराष्ट्र व्यवहार मंत्री मनसीलाल लड्डा, सेना प्रमुखपदी अमृत गडकरी, शस्त्रास्त्र पुरवठा भोला चटर्जी, राजकंवर काबरा हे काम पाहत होते. बाबनभाई शेख हे गोवर्धन सरल्याचे सरपंच होते.

सराला बेटावर लक्ष्मण अलकटवार, मगनसिंह राजपूत, रामचंद्र धंदेलवार यांच्यासह दहा ते बारा सैनिकांचा आणि रजाकारांचा संघर्ष झाला यात दोन-तीन रजाकार जखमी झाले, तर धंदेलवार हे शहीद व नंदराम जखमी झाले. यामुळे त्यांचा बेटावर पोहोचण्याचा बेत फसला. येथील संघर्ष 'मंतरलेले पाणी' या पुस्तकात शब्दबद्ध करण्यात आला आहे. 17 सप्टेंबर 1948 रोजी जनतेच्या इच्छेनुसार हैदराबाद संस्थान विलीन करून घेण्याचा धाडसी निर्णय सरदार वल्लभभाई पटेल यांनी घेतला आणि त्याचवेळी येथील समाजवादी जनराज्य ही भारतात विलीन झाले. आज त्याला 75 वर्षांचा काळ लोटला आहे. दरम्यान, विलीन झाल्यानंतर ही चार गावे वैजापूर तालुक्यात होती. ती 1984 साली श्रीरामपूर तालुक्यात समाविष्ट करण्यात आली.

या संग्रामातील लढ्याचे साक्ष देणारे हे स्मारक आजही सोयीसुविधांपासून दुर्लक्षित आहे. एकीकडे इतिहासाचे जतन होत असताना आपल्या तालुक्यात एक स्वतंत्र राज्य अस्तित्वात होते याची पुसटशी कल्पनाही अनेक श्रीरामपूरकरवासियांना अद्यापही झालेली नाही हेच या लढ्यातील स्वातंत्रसैनिकांनी सांडलेल्या रक्ताचे दुर्भाग्य म्हणावे लागेल.

रजाकारांशी लढा देताना नदीच्या कडेला बंकर खोदून निगराणी करावी लागे. एकेवेळी रजाकारांचा गुप्तहेराला आम्ही पकडले. त्याला येथेच कोंडून ठेवून त्याचा शेवटपर्यंत व्यवस्थित सांभाळ केला, अशी आठवण स्वातंत्र्य सैनिक एकनाथ लक्ष्मण औताडे (वय 101) यांनी 'सरकारनामा'ला सांगितल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT