Jayant Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil News : 'गडावरील अतिक्रमणाविरोधात आमची भूमिका, पण..' विशाळगड प्रकरणी जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं!

Umesh Bambare-Patil

Satara News : 'गडावरील अतिक्रमणाविरोधात आमची भूमिका आहे. पण, अतिक्रमणे काढण्याचा काळवेळ सरकारने पाहायला हवा होता. विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या छोट्या गावात लूटमार, नासधूस करण्याची घटना घडली ती गंभीर आहे. हा प्रकार पोलिसांच्या दुर्लक्षामुळे झाला आहे. स्थानिकांनाही यामध्ये मारहारण झाली असून हा प्रकार महाराष्ट्राला भूषणावह नाही.'

तसेच 'हे राज्य सरकारचे अपयश असून या घटनेस जबाबदार असलेल्यावर कडक कारवाई करावी.', अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी साताऱ्यात व्यक्त केली.

विशाळगडावर झालेल्या घटनेवर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी साताऱ्यात भाष्य केले. ते म्हणाले, 'विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हिंदू, मुस्लिम दरी निर्माण करण्याचा प्रयत्न कोण-कोणत्या घटनेतून होतोय यासाठी काही शक्ती कार्यरत झाल्या आहेत. त्यांच्याकडून विशाळगडासारख्या घटनांच्या माध्यमातून प्रयत्न होत आहे.

गडाच्या पायथ्याला छोटसे गाव असून त्या ठिकाणी धार्मिक स्थळ आहे. मात्र येथील लोकांच्या घरात घुसून नासधुस व लुटमार केली आहे. काही लोकांनी या अतिक्रमण काढण्याला स्थगिती घेतली होती. पण सरकारने पाऊस सुरु होण्याआधीच याबाबत निर्णय घ्यायला हवा होता.'

याशिवाय 'पायथ्याशी असलेल्या गावात जी घटना घडली ती अत्यंत गंभीर आहे. तेथील सर्व धर्मीय लोकांना मारझोड करणे, लुटमार करणे हे महाराष्ट्राला भूषणावह नाही. हे राज्य सरकारचे अपयश आहे.

काहींना गडावर जाऊन दिले नाही, म्हणून मुस्लिम वस्तीवर जाऊन असा प्रकार करणे योग्य नाही. अशांवर कडक कलमे लावून कारवाई झाली पाहिजेत अशी आमची मागणी आहे.' असं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं.

याचबरोबर'आम्ही गडावरील अतिक्रमणांच्या विरोधात आहोत. पण, अतिक्रमण काढण्याचे काम सरकारने पावसाच्या आधी करायला हवी होते. ते भर पावसात केले आहे. हे अतिक्रमण काढायला देखील काळवेळ बघायचा असतो.

भरपावसात अतिक्रमण काढताना काही हिंदू लोकही तेथे राहत होते. तेथे विविध धर्माची लोक आहेत. त्यांची पर्यायी व्यवस्था करुन देऊन मगच अतिक्रमणे काढायला हवी होती. हे सरकारचे अपयश आहे.' अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

तसेच 'गजापुर गावात केवळ दोन पोलिस बंदोबस्ताला होते. पोलिस अधीक्षक विशाळगडाच्या पायथ्याशी होते. त्यांनी जादा कुमक पाठवून पूर्ण पोलीस पुढे जातील, याची काळजी घ्यायला हवी होती. हा प्रकार सुरु असताना त्या ठिकाणी पोलिस पोहचायला पाहिजे होते. हा प्रकार पोलिसांनी दुर्लक्षामुळे झालाय का?, हे पहायला हवे.'

'पोलिसांनी बघ्याची भूमक्का घेतली अशी स्थानिकांची तक्रार आहे. ज्या स्थानिकांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही मारहाण झाली आहे. विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हिंदू, मुस्लिम दरी निर्माण करण्याचा प्रयत्न कोणत्या घटनेतून होतोय यासाठी काही शक्ती कार्यरत झाल्या आहेत. त्यांच्याकडून हा प्रयत्न होत आहे.', असेही जयंत पाटील म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT