Sangli News : काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची दावे केले जात आहे. यावरुन महायुतीमधील नेतेमंडळींकडून दावे-प्रतिदावे केले जात आहे. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही पाटलांच्या पक्षप्रवेशावरुन भाजप पदाधिकारी आमदारांचे चांगलेच कान टोचले आहेत. जयंत पाटलांची (Jayant Patil) बदनामी करू नका, अशा शब्दात त्यांनी भाजप नेत्यांना सुनावले आहे. त्यानंतर काही तासांतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यामुळे पुन्हा एकदा जयंत पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या या चर्चांना उधाण आलं आहे.
अशातच जयंत पाटील माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर चांगलेच संतापलेले दिसले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते सोमवारी(ता.17) सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट मधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वस्तीग्रह आणि व्यायाम शाळा उद्घाटनाच्या हॉलमध्ये बोलत होते. माझ्या कार्यक्रमासाठी नितीन गडकरी आले, म्हणजे आता गडकरी हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या चालवू नका,अशा शब्दांत जयंत पाटील यांनी फटकारले आहे.
मीडियानं प्रश्न विचारताच माझी पत्रकारांना विनंती आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या तुम्ही चालवू नका. गेल्या काही दिवसांपासून अशा चर्चा सुरू आहेत. मात्र, आता नामांकित पत्रकार देखील बोलू लागले आहेत याचं आश्चर्य वाटत आहे. चांगल्या कामासाठी दोन वेगवेगळे पक्षांतील लोक एकत्र येऊ शकत नाहीत का? अशीच पत्रकारांची धारणा झालेली आहे का? हे चित्र पाहून मनाला खूप वेदना होतात,अशी खंतही जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
आजपर्यंत या संस्थेत रतन टाटा यांच्यापासून अनेक दिग्गज मान्यवर आले आहेत. ज्यामध्ये अनेक विरोधी पक्षनेते देखील येऊन गेले आहेत. आता आमच्या विनंतीला मान देऊन नितीन गडकरी आले त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानत असल्याची भावना व्यक्त केली.
दरम्यान,केंद्रीय मंत्री व भाजप नेते नितीन गडकरी यांनीही आपल्या भाषणात देखील पत्रकारांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले, आजचा हा कार्यक्रम राजकीय नसून जयंतराव माझे चांगले मित्र आहेत, यामुळेच मी या कार्यक्रमाला आलो आहे. आमचे राजकीय विचार वेगळे असले तरी मनात भिन्नता नाही. जयंत पाटील यांनी याच्याही पुढे जाऊन कृषी क्षेत्रात काम करावे असा सल्लाही गडकरी यांनी यावेळी आपल्या भाषणात दिला.
कोल्हापूर, सांगली आणि सातारा या भागात नवीन गोष्टी शिकायला मिळतात. सहकार, कृषी आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील येथे मोठं काम झालं आहे. लोकांना वाटतं, गडकरींना इंजिनिअरिंगमधलं कळतं, म्हणूनच ते आले असतील. पण तसं काही नाही. गेल्या तीन-चार वर्षांत मी पेड ते सांगली या खराब रस्त्यामुळे खूप शिव्या खाल्ल्या आहेत. मात्र, आता या रस्त्याचं 80 टक्के काम पूर्ण झालं असून दर्जा सुद्धा उत्तम असल्याचं गडकरी म्हणाले.
तर भारताला आत्मनिर्भर बनवण्याचं पंतप्रधान मोदींचे स्वप्न असून आपल्या देशात युवकांची जास्त संख्या आहे. देशाला प्रगत करायचं असेल तर शहरांच्याबरोबर ग्रामीण भागाचाही विकास करायला हवा. त्याशिवाय आत्मनिर्भर भारत होणार नाही, असेही गडकरी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.