शहाजीबापू पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतील पडद्यामागील आर्थिक घडामोडी सार्वजनिक करत भाजपवरच गंभीर आरोप केले.
मित्रपक्ष असूनही भाजपने आपला घात केला, निधी शेकापमार्फत प्रतिस्पर्ध्यांकडे पोहोचवला, असा दावा त्यांनी सभेत केला.
स्वाभिमान आणि अस्मिता जपण्यासाठी धनुष्यबाणाला मतदान करण्याचे आवाहन करत त्यांनी आपल्या योगदानाची आठवण करून दिली.
Sangola, 23 November : विधानसभा निवडणुकीवेळी पडद्यामागे घडलेल्या घडामोडी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने चव्हाट्यावर आणल्या आहेत. त्या आणताना भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांसाठी आपण कसं जीवाचे रान केले, हेही सांगायला शहाजीबापू विसरले नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी मित्रपक्ष असलेल्या भाजपने आपला घात केला आहे, हे आपल्याला ठावूक होते हे सांगताना ‘जयकुमार गोरे...विधानसभा निवडणुकीच्या वेळी तुमच्या रक्कमा शेकापकडे कशा गेल्या आणि तिकडून त्या जवळ्याला कशा पोचल्या’ हे जाहीर सभेतून सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सांगोल्यात नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. त्या सभेत बोलताना शहाजीबापूंनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंना पुन्हा टार्गेट केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या समोरच शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी भाजप आणि भाजप नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
माजी आमदार पाटील म्हणाले, जयकुमार गोरे (Jaykumar Gore) मला माहीत होतं. इतका भामटा शहाजीबापू नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी तुमच्या रक्कमा शेकापकडे कशा गेल्या आणि तिकडून त्या जवळ्याला (माजी आमदार दीपक साळुंखे यांचे गाव) कशा गेल्या? त्याचे टायमिंग आणि माणसांची नावं मला ठावूक होती. पण मी गप्प बसलो होतो.
निवडणुकीच्या अगोदर मला माहीत होतं. भाजपनं माझं कंबरडं मोडलं आहे. पण, मी शांत राहिलो. काही बोललो नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मी काही टीका केली नाही. पण, भाजपनं शेकापला केलेली मदत संपूर्ण तालुक्याला माहिती होती. तरीही मित्रपक्ष असल्यामुळे आम्ही सहन केलं. आज जुळवायचं सोडून तोडायचं करता तुम्ही. माझा काय गुन्हा होता, असा सवाल पाटील यांनी केला.
ते म्हणाले, पंढरपूरचे प्रशांत परिचारक यांना आमदार करण्यासाठी आम्ही देाघं भाऊ भाऊ तीन महिने झोपलो नाही. रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून आले पाहिजेत; म्हणून आमदार उत्तम जानकर यांचे पाय धरले मी. माझ्या दोस्ताचा पोरगा आहे, एवढा वेळ माझं ऐक म्हणून जानकर यांना विनंती केली. माळशिरसमध्ये एक लाख मतांनी मागं पडलं.
देवेंद्र फडणवीस यांचे उत्तम जानकर यांनी ऐकलं नाही; म्हणून त्या भागात दीड वर्षे चहासुद्धा प्यायला गेलो नाही. एवढं प्रमाणिकपणे वागलो असताना माझ्यासंगं असं कशासाठी वागता? मला निवडणुकीची भीती नाही, मी लढणारा आहे. मेलो तरी स्वाभिमान गहाण ठेवणारा नाही. ही लढाई स्वाभिमाची, एकनाथ शिंदेंच्या अस्मितेची. ही अस्मिता जपण्यासाठी धनुष्यबाणाला मतदान करा, असे आवाहन शहाजी पाटील यांनी केले.
प्र.1: शहाजीबापूंनी कोणावर आरोप केले?
उ: पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजपवर आर्थिक घात केल्याचा आरोप केला.
प्र.2: त्यांनी कोणती बाब सर्वांसमोर आणली?
उ: विधानसभा काळातील पैसे शेकापमार्फत प्रतिस्पर्ध्यांकडे गेल्याचा मुद्दा उघड केला.
प्र.3: शहाजीबापूंनी कोणत्या भावना व्यक्त केल्या?
उ: मित्रपक्ष असूनही विश्वासघात झाल्याची खंत व्यक्त केली.
प्र.4: त्यांनी मतदारांना काय आवाहन केले?
उ: धनुष्यबाण चिन्हाला मतदान करून स्वाभिमान जपण्याचे आवाहन केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.