रामराजे नाईक निंबाळकर यांनी अलीकडे मनोमिलनाची भाषा केली होती, पण जयकुमार गोरे यांनी ती थेट फेटाळली.
गोरे म्हणाले, प्रेमाचं एक वय असतं; उतारवयात प्रेम सुचलंय, पण आता वेळ निघून गेली आहे.
त्यामुळे फलटणच्या राजकारणातील रामराजे, रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि गोरे यांच्यातील मतभेद अधिकच ठळक झाले आहेत.
Pandharpur, 06 October : विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वी फलटणच्या राजकारणासंदर्भात मनोमिलनाची भाषा केली होती. त्याला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी उत्तर दिले आहे. ‘प्रेम करायचं एक वय असतं; परंतु त्यांना हे उतारवयात प्रेम सुचलंय. प्रेम करायचं वय आता निघून गेलंय’, असं सांगून गोरे यांनी रामराजेंचा मनोमिलनाचा प्रस्ताव धुडकावल्याचे मानले जात आहे.
फलटणच्या राजकारणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्यामधील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी रामराजे यांनी ‘मनोमिलन हे एकतर्फी प्रेमातून होत नाही. विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल,’ असे म्हटले होते. त्यांचा तो प्रस्ताव माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मित्र आणि सोलापूरचे पालकमंत्री गोरे यांनी धुडकावल्याचे मानले जात आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) म्हणाले, रामराजेंना उतारवयात प्रेम झालेले आहे. प्रेम करायचं एक वय असतं. त्यावेळीच प्रेम बहरत असते. पण, आयुष्यभर सत्तेचा वापर करून लोकांना त्रास दिला. लोकांची घरं देशोधडीला लावण्याचं काम रामराजे यांनी केलं आहे. त्यांना आता उतारवयात जे प्रेम आलेले आहे. ते जनतेचा विश्वास गमावून जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यातून जी असुरक्षितता निर्माण झाली आहे, त्याचा परिणाम म्हणजे रामराजेंना प्रेम आठवायला लागले आहे.
रामराजे आता हतबल झाले आहेत, असं मी म्हणणार नाही. त्यांना त्यांचे अधिकार आहेत. राजकारणात प्रत्येकाची वेगळी ताकद असते, ती त्यांनी अजमावावी. सत्ता असताना, मंत्री असताना आणि विधान परिषदेचे सभापती असताना कायम लोकांना त्रास देताना मजा वाटते. त्या परिस्थितीतून (सत्तेतून) बाजूला असताना समाजकारण, राजकारण आणि निवडणूक लढाव्यात, म्हणजे सगळ्या गोष्टी लक्षात येतात, असे आव्हानही गोरे यांनी रामराजेंना दिले.
रामराजेंना शहाणपण सूचलं की काय, हे मला माहिती नाही. पण, उतारवयात त्यांना हे सूचलं आहे. मात्र, आता वेळ निघून गेलेली आहे. कुणासोबत त्यांना मनोमिलन करायचं आहे, हे त्या दोघांना विचारायला पाहिजे. मनोमिलनासाठी दोघांचीही इच्छा असायला पाहिजे, असेही गोरे यांनी सुनावले.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजेंचा प्रस्ताव धुडकावून लावत मनोमिलनाची वेळ आता निघून गेली आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे फलटणच्या राजकारणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील मनोमिलनाची चर्चा सुरू होण्यापूर्वीच फिस्कटल्याची चिन्हे आहेत.
प्रश्न 1 : रामराजेंनी कोणता प्रस्ताव मांडला होता?
राजकीय मनोमिलनाचा.
प्रश्न 2 : जयकुमार गोरे यांनी काय उत्तर दिले?
त्यांनी म्हटले की प्रेमाचं वय निघून गेलं आहे, त्यामुळे प्रस्ताव फेटाळला.
प्रश्न 3 : फलटणच्या राजकारणात कोणते प्रमुख नेते वैरात आहेत?
रामराजे, रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे.
प्रश्न 4 : या वक्तव्यामुळे काय परिणाम दिसतोय?
मनोमिलनाची चर्चा सुरू होण्यापूर्वीच फिस्कटल्याची चिन्हे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.