Manoj Jarange Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : मनोज जरांगे-पाटलांना पाठिंब्यासाठी कराड बंदची हाक!

उमेश भांबरे :सरकारनामा

Manoj Jarange Patil News : मनोज जरांगे -पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक सकल मराठा समाजाने दिली आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी कराड तालुक्यात शांततेच्या मार्गाने अत्यावश्यक सेवा वगळुन उद्या (बुधवारी) बंद जाहीर करण्यात आला आहे. त्याला सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.

राज्य सरकारने आश्वासित केल्याप्रमाणे 'सगे-सोयरे' अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे व लवकरात लवकर अंमलबजावणी सुरू करावी, या मागणीसाठी जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे पुन्हा बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी उद्या (बुधवारी) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बंद हा शांततेत व संयमात असला पाहिजे, जाळपोळ उद्रेकास मराठ्यांचा पाठिंबा नाही, असेही जरांगे पाटील यांनी सूचित केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्याचा विचार करुन कराड तालुका सकल मराठा समाजाची मंगळवारी तातडीची बैठक येथे झाली. त्यात जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांनी जी मागणी केली आहे ती सरकारकडून पुर्ण व्हावी यासाठी कराड तालुका मराठा समाजाच्यावतीने तालुक्यामध्ये शांततेच्या मार्गाने बंद जाहीर करण्याचे ठरवण्यात आले. त्याला सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रश्नांवर पुढील काही दिवसांतच तोडगा निघणार आहे. मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देण्याची शिफारस राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने केली जाणार आहे, अशी विश्वसनीय माहिती सूत्रांनी 'सरकारनामा'ला दिली आहे. यामुळे मराठा समाजाला ओबीसींमधून नव्हे, तर स्वतंत्रपणे आरक्षण मिळण्याची दाट शक्यता आहे.

मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे आणि समाजातील गोरगरीब मुलांना आवश्यक तो फायदा आरक्षणाच्या माध्यमातून व्हावा, यासाठी चार दशकांहून अधिक काळ लढा सुरू आहे. त्याचवेळी मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. मात्र, ओबीसीमधून (OBC Reservation) नको, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे.

'मराठा आरक्षणावर सध्या राज्यात सुरू असलेले राजकारण दुर्दैवी आहे. यासंदर्भात छगन भुजबळ यांनी हा विषय नीट समजून घ्यावा. त्यावर राजकारण करू नये', अशा शब्दांत ओबीसी परिषदेचे राष्ट्रीय नेते, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी भुजबळांचा समाचार घेतला. तसेच मराठा समाजाला ओबीसी समाजाचे नुकसान न करता आरक्षण द्यावे, अन्यथा मराठा आणि ओबीसी हे दोघेही शिंदे सरकार समुद्रात फेकून दिल्याशिवाय राहणार नाही, असा निशाणा राठोड यांनी साधला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT